पिंपरी – भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातील मंजूर पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या 26 किलोमीटर जलवाहिनीचे अंतर जास्त नाही. त्याचे काम वर्षभरात पूर्ण झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन कोणत्याही परिस्थितीमध्ये महिनाभरात करून महापालिकेच्या ताब्यात जागा द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना केली. तसेच महापालिकेने पाणी पुरवठ्याची कामे वेगाने करून पुढील दोन वर्षात मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असेही ते म्हणाले.
आकुर्डी येथे महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मनपा आयुक्त शेखर सिंहउपस्थित होते.
शहर वेगाने वाढतांना पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट महत्वाची आहे. शहराचे सौंदर्य शाश्वत विकासात आहे. पिण्याच्या पाण्याचा विचार करताना सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, महापालिकेच्या परिसरात औद्योगिक क्षेत्र असल्याने या कंपन्यांना पुर्नवापर केलेले पाणी घेणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास शहराच्या परिसरातील गावांनाही पाणी प्रश्न मिटेल. याचबरोबर नद्यांचे होणारे प्रदूषण थांबविता येईल, असेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री पाटील, खासदार बारणे यांनी मनोगत व्यक्त केले. तर आयुक्त सिंह यांनी प्रास्ताविक केले.
शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक
भविष्यातील शहरांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश आहे. त्यामुळे या शहराकडून मोठ्या अपेक्षा आहे. शहराचे संचलन करणारी इमारत सुंदर असली पाहिजे. अशी प्रशासकीय इमारत लवकरच उभी राहणार आहे. पोलीस आयुक्तालयासाठी नवीन इमारत आणि मनुष्यबळ देण्यात येणार आहे. शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर बैठक आयोजित करून वेगाने निर्णय घेण्यात येतील, अशीही ग्वाही फडणवीस यांनी दिली.