वर्धा – महाशिवरात्रीनिमित्त मध्य प्रदेशात निघालेल्या भाविकांच्या कारला झालेल्या भीषण अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडला.या दुर्घटनेने गावात शोककळा पसरली.
अक्षय गौरखेडे, तुषार झामडे आणि दीपक डाखोरे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, वर्ध्यातील आष्टी येथून काल सायंकाळी चार मित्र मध्य प्रदेशातील पंचमढी येथे भोलेनाथांच्या देवदर्शनाला निघाले होते.
मोरका गावाजवळील एका वळणावर चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वाहन भिंतीला धडकले. या धडकेत कारमधील तीन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला.