डिंभे -आंबेगावच्या आदिवासी भागात पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. जवळपासचे पाणवठे आटल्याने डोंगर उतरून डोंगरदऱ्यांत थोड्याफार प्रमाणात असणाऱ्या पाणवठ्यावरून पाणी आणताना आदिवासी बायाबापड्यांची दमछाक होत आहे. ऐन उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होऊनही हंडाभर पाण्यासाठी वणवण करताना आदिवासी महिला जातानाचे चित्र या परिसरात पाहावयास मिळत आहे.
डिंभे धरणाच्या आत घोडनदीवर बांधण्यात आलेले बंधारे तर कोरडे ठणठणीत पडले आहेत आणि अडिवरे व कोकणेवाडी, फुलवडे येथील बंधाऱ्यात जेमतेम पाणी शिल्लक असून, तेही दूषित होऊ लागले आहे आणि विहिरींनी तळ गाठला आहे. आंबेगाव तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागात यंदा पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत.
यंदा पावसाने या भागातून लवकरच काढता पाया घेतल्याने दुर्गम गावे व वाड्या-वस्त्यांजवळील पाण्याचे नैसर्गिक स्रोत महिनाभर आधीच आटू लागल्याचे पाहावयास मिळत आहे. ऐन रणरणत्या उन्हात खोल गेलेल्या धरणपात्रातून डोक्यावर पाणी वाहून आणताना महिला, मुले व पुरुषांचीही दमछाक होत आहे.
धरणाचे पात्र खोल गेल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बेंढारवाडी, वचपे, मेघोली, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द या गावांनाही पाणीटंचाईच्या झळा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेबरोबरच जाणवू लागल्या आहेत.
डोंगरदऱ्यांतील पाण्याचे स्रोत आटू लागल्याने रणरणत्या उन्हात डोक्यावर हांडे घेऊन पायाखालचा फुफाटा तुडवत घोटभर पाण्यासाठी बायाबापड्यांची पायपीट सुरू झाली आहे.
डोंगरमाथ्यावरील आहुपे खोऱ्यातील कोंढरे, न्हावेड, नाणवडे, आघाणे, तिरपाड, पिंपरगणे, डोणी, कापरवाडी, भोईरवाडी तर बोरघरच्या उंबरवाडी, काळवाडी या डोंगर माथ्यावरील आदिवासी वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
जनावरांचे पाण्यावाचून हाल
माणसांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचेही हाल होऊ लागले आहेत. आधीच चाराटंचाई त्यात पिण्याच्या पाण्याचेही हाल होऊ लागल्याने यंदा पाळीव जनावरेही सांभाळताना आदिवासी शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत. एकंदरीतच स्थानिक पाणवठे आटल्याने निर्माण होऊ लागलेली पाणीटंचाई, तर डिंभे धरणातील दिवसेंदिवस घटत जाणारी पाणीपातळी यामुळे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात यंदाचा उन्हाळा अधिकच कडक जाणार असे दिसत आहे.