कोल्हापूर- महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत वाढ झाल्याची टीका सातत्याने केंद्र सरकारवर होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीशी संबंधितांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे.
केंद्र सरकार विरोधकांना त्रास देत असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. मनमोहन सिंग, वायपेयी सरकारच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर कामासाठी केला जात होता, असे चव्हाण म्हणाले आहेत.
आताचे सरकार विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआय, आयकर विभाग या संस्थांचा गैरवापर करत आहे. विरोधी राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आता केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत आहे. हे लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका यावेळी चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे कोल्हापूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. सभेत बोलताना चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.