मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात शिवाजी पार्कवर विविध मुद्द्यांवर भाष्य केले होते. त्यानंतर त्यावर राज्यात वाद-प्रतिवाद देखील झाला. पण मस्जिदीवरील भोंग्यांच्या विषयावर राज ठाकरेंच्या भाषणाने राज्यात धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. परिणामी राज ठाकरेंना जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे.
पक्षातील काही नेत्यांनी राज ठाकरेंच्या या निर्णयावर नाराजी वर्तवली आहे. तर काहींनी राजीनामे दिले आहेत. अशातच समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी राज ठाकरेंवर जोरदार जहरी टीका केली आहे. परिणामी राज्यात वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ज्या पक्षाला फार महत्त्व दिलं जात नाही, ज्यांना जनाधार नाही, अशा नेत्यांचं लोकांनी का ऐकावं, अशा नेत्यांनी धार्मिक वक्तव्य करून वातावरण खराब करू नये. राज ठाकरेंना अटक करून जेलमध्ये टाकण्यात यावं, अशी मागणी आझमी यांनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राज्यात मनसे पक्षाअंतर्गत देखील धुसफुस वाढली आहे. अनेक ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.