तुझ्या पोलादी टाचेखालून जित्या पाण्याचे निघतील झरे ।
तुझ्या लोखंडी दंडामधून वाहे विजेची ताकद की रे ।।
चल मारू धडक, उभा फोडू खडक, आता कशाची भूक-तहान ।
चल उचल हत्यार, गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण ।।
अशी गाणी गाऊन हे श्रमिका, आम्ही तुझ्यात काम करण्यासाठी ताकद भरली; पण ज्या नव्या जगाची शपथ तुला घातली, त्यात तुलाच जागा नाही हे सांगायला विसरलो. हल्ली पुढं जायच्या गडबडीत इतकं विसरायला होतं ना..! पण खरं तर काही गोष्टी न सांगताच ओळखायला हव्या होत्यास तू. आधी आम्ही अतिअवजड यंत्रं तुझ्यासमोर उभी केली आणि तुझ्या कामाची, तुझ्या घामाची फारशी गरजच उरलेली नाही याची स्पष्ट जाणीव तुला करून दिली. नंतर घरचे ठेकेदार नेमून बाहेरच्या माणसांना आत घेतलं आणि घरच्या-बाहेरच्या अशा दोघांनाही कामाची शाश्वती असू नये, असं अस्थिर वातावरण बनवलं.
कामाचं “मूल्य’ एकदा कमी झाल्यानंतर पुढची वाट सोपी होती. तू कुठेही राहा, कसाही राहा, काहीही खा, कसाही प्रवास कर; पण वेळेत कामावर ये आणि जाताना घड्याळ बघू नकोस, हे सांगता-सांगता तुझ्या पोलादी टाचा, लोखंडी दंड वगैरे आपोआप विस्मृतीत गेलं. तुझी फरफट हे “रोजचं मढं’ करून टाकल्यानंतर एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात तुझ्यासाठी रडण्याचं कारणच काय?
सोशल मीडियावर “डिस्कस’ करायला आमच्याकडे विषयांची कमतरता नाही. त्यामुळे कुणी तुझ्यासाठी एखादा “हॅशटॅग’ चालवेल या भ्रमात राहू नको. अर्थात, चालवला तरी तुला त्यातलं काय कळणार? “घरी जायचंय’ म्हणून गळा काढलास तेव्हा नोंदणीची साधी-सोपी प्रोसीजर डिझाइन केली, तीसुद्धा फॉलो करता आली नाही तुला. फॉर्मची पीडीएफ फाइल तुला मोबाइलवर पाठवली जाणार. मोबाइलमध्ये सोय नसेल तर पेनड्राइव्हवर फॉर्म घेऊन जायचा. इंग्रजीत तो भरायचा. नंतर कोणत्याही डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायची आणि मेडिकल सर्टिफिकेट आणायचं. नंतर 25-30 जणांचे ग्रुप तयार करणार. ग्रुप लीडरने पोलीस स्टेशनमधून टोकन घ्यायचं. नंतर लायनीत उभं राहून फॉर्म जमा करायचे.
तो फॉर्म पोलीस तुझ्या राज्यात पाठवतील आणि तिकडून परवानगी मिळाल्यानंतर तुझी घरी जायची व्यवस्था होईल… पण हा सरळमार्ग तुला मान्य नाही. तुला हवाय शॉर्टकट. तोसुद्धा हायवेवरून नव्हे; रेल्वेच्या रुळांवरून! मुंबई ते रत्नागिरी असो, लखनौ ते पाटणा असो किंवा जालना ते औरंगाबाद असो… पोलिसांना चकवण्यासाठी हीच आडवाट तू निवडलीस आणि गोत्यात आलास. चार-दोन लोक मरत होते तोपर्यंत ठीक होतं; पण एकदम सोळा मेल्यावर विनाकारण चर्चा होणारच ना?
रेल्वेरुळांवर तूच अंथरलेली जाड खडी तुझ्या “पोलादी टाचां’मध्ये रुतणार नाही, हा भ्रम दूर झालाय? पोराबाळांना उचलून “लोखंडी दंड’ अवघडलेत? अरे, मद्यपींच्या एवढीसुद्धा किंमत कमावू शकला नाहीस आजवर तू! आणि हो… आता पुन्हा कामावर जायचंच नाही, असं मनात येत असेल आणि त्यामुळे आमचं घोडं अडेल असं वाटत असेल, तर विसरून जा! बारा तासांची शिफ्ट वगैरे निर्णय आम्ही ऑलरेडी घेऊन टाकलेत. आम्हाला ओळखलं नाहीस तू अजून!
– हिमांशू