सातारा (प्रतिनिधी) – जिल्हा कारागृहातील नऊ कैदी करोनाबाधित निघाल्याने प्रशासनाची झोप उडाली होती. त्यावर, “कारागृह प्रशासनाचा कैद्यांच्या जिवाशी खेळ?’ असे वृत्त दैनिक “प्रभात’ने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेऊन कारागृह प्रशासनाने बाधित कैद्यांच्या निकट सहवासातील पंधरा कैद्यांना शहराबाहेर एका ठिकाणी विलगीकरण करून ठेवले आहे. याबाबत प्रशासनाकडून गोपनीयता बाळगण्यात आली होती.
याबाबत माहिती अशी, पुण्यावरून सातारा जिल्हा कारागृहात आणलेले नऊ कैदी करोनाबाधित असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. या बाधित कैद्यांच्या संख्येमुळे कारागृहात व सातारा शहरात खळबळ उडाली होती. इतर कैद्यांच्या पालकांना धडकी भरली होती. या प्रकारावर प्रकाश टाकणारे परखड वृत्त “प्रभात’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कारागृह प्रशासन व पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यातच तीन बड्या पोलीस अधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी सायंकाळी महत्वाची बैठक झाली होती. त्यात कैद्यांचे विलगीकरण, सुरक्षा, जागेचा शोध यावर मंथन झाले होते. त्यानंतर शहराबाहेर एका संकुलाच्या परिसरातील जागा निश्चित करण्यात आली. त्याबाबत कारागृह प्रशासनाला कळवण्यात आले. कारागृह प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिल्यानंतर तिकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यानुसार रविवारी त्या पंधरा कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
असा असेल पहारा
या गोदामासारख्या इमारतीभोवती पोलीस मुख्यालयातील पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांचे कडे असणार आहे. कैद्यांना ठेवलेल्या इमारतीत कारागृहाचा एक अधिकारी व तीन कर्मचारी दिवसरात्र तैनात असणार आहेत.
जेवण, नाश्ता कारागृहातूनच जाणार
या कैद्यांना कारागृहाबाहेर ठेवले असले तरी त्यांना दररोजचा नाश्ता व दोन्ही वेळचे जेवण कारागृहातूनच जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कारागृहात व बाहेर भीतीचे सावट
‘जिल्हा कारागृहाची क्षमता 159 कैद्यांची असली तरी तेथे सध्या तीनशे कैदी आहेत. त्यातच पुण्यातील कैद्यांमुळे करोनाचा शिरकाव कारागृहात झाल्याने आतील कैदी व सुरक्षारक्षक आणि बाहेर कैद्यांचे नातेवाईक व पोलीस यांच्यावर भीतीचे सावट आहे.