एका परदेशी मोबाइल कंपनीने नुकताच एक अत्याधुनिक स्मार्टफोन लॉंच केला. भारतात या मॉडेलचे जितके फोन विक्रीसाठी आले, त्यासाठीची नोंदणी अवघ्या काही मिनिटांत आटोपली आणि हा स्मार्टफोन लगेच “आउट ऑफ स्टॉक’ झाला, अशी बातमी वाचायला मिळाली. त्यानंतर अवघ्या काही तासांत पंतप्रधानांनी “आत्मनिर्भर भारत अभियाना’ची घोषणा करून वीस लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. या दोन्ही बातम्यांकडे बारकाईनं पाहिल्यास एक त्रासदायक विरोधाभास समोर येतो. आता “आत्मनिर्भर भारत’ची प्रशस्ती जेव्हा “त्या’ स्मार्टफोनवरून सुरू होईल, तेव्हा हा विरोधाभास आणखी गडद होईल.
करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे जगात, देशात, अर्थव्यवस्थेत, आचार-विचारात, जीवनशैलीत मोठा फेरबदल होण्याचे संकेत मिळत असतानाच या दोन बातम्या वाचायला मिळणं चिंतनशील माणसाला आव्हानात्मक वाटल्याखेरीज राहणार नाही. कारण सगळंच जरी बदललं तरी मानसिकता बदलत नाही, हे यातून दिसून येतंय. खरं तर सध्याचं संकट जागतिकीकरणाची दिशा आणि स्वरूप बदलणारं ठरणार, हे स्पष्ट झालंय. आयात-निर्यातीची गणितंही बदलणार आहेत. व्यापारी मार्गानं परस्परावलंबी बनलेलं जग आता पुन्हा स्वावलंबी बनण्याच्या मूडमध्ये आहे. परंतु जर आपल्या मानसिकतेत बदल घडून आला नाही, तर स्वावलंबी बनण्याचा मार्ग खडतर आहे. “गरजेचं’ काय आणि “चैनीचं’ काय, हे लॉकडाऊनने आपल्याला शिकवलंय. शिथिलता येताच आपण हे विसरलो तर शिकून काय उपयोग?
आपल्या देशात प्रतिभावंतांना तोटा नाही, हे बदललेल्या जागतिक परिस्थितीत पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. कोणताही देश दुसऱ्या देशाला मर्यादेपेक्षा जास्त मदत करू शकत नाही, अशी अवस्था असताना एकच व्हेन्टिलेटर आठ रुग्णांसाठी वापरता येईल, असं यंत्र नागपूरच्या हॉस्पिटलमधील एका डॉक्टरनं तयार केलं. शिवाय “जीवन’ आणि “प्राणवायू’ नावाची दोन व्हेन्टिलेटर्स दोन वेगवेगळ्या संस्थांनी अत्यल्प खर्चात तयार केली. व्हेन्टिलेटरसारखं काम करणारा मास्कसुद्धा बेंगळुरूत तयार झालाय. जंतुनाशकांची फवारणी करणारं ड्रोन गुवाहाटीत तयार झालं. रुग्णाच्या हृदयाचे ठोके डॉक्टरांना दुरूनच मोजता येतील, असं उपकरण मुंबई आयआयटीने तयार केलं. तीन चतुर्थांश कमी खर्चात करोनाचं टेस्ट किट “माय लॅब’ नावाच्या भारतीय संस्थेनं विकसित केलं. नौदलासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानातून व्यक्तिगत सुरक्षा कवचाची (पीपीई) निर्मिती डीआरडीओने सुरू केली आणि या उत्पादनात भारताने जगात दुसरा क्रमांक मिळवला. याच डीआरडीओने आता अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर तयार केलाय. अतिनील किरणांच्या साह्यानं खोलीचं निर्जंतुकीकरण शक्य झालंय. जेव्हा आणीबाणीची परिस्थिती उद्भवते तेव्हा भारतीय हातपाय गाळत नाहीत तर झटून कामाला लागतात, हे स्पष्ट झालंय. आत्मनिर्भरतेकडे, स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू करण्यासाठी याहून अधिक अनुकूल काळ कोणता?
आपल्या अर्थव्यवस्थेची पडझड झालीये, आगामी काळात अनेक समाजघटकांचे हाल होणार आहेत, अशी आव्हानात्मक परिस्थिती आपल्यासमोर आहे. परंतु स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना मांडणाऱ्या गांधीजींनी आपल्याला स्वावलंबनाचा मार्ग दाखवून ठेवलाय. या मार्गावर काही ठिकाणी मन मारावं लागेल आणि बऱ्याच ठिकाणी इच्छांना मुरड घालावी लागेल. देशप्रेम केवळ भावनिक स्वरूपात न राहता व्यवहारात उतरवावं लागेल. कुणावर अवलंबून राहणं शक्यच नाही, ही परिस्थिती केवळ अडचणीची नसते. ती आत्मबळ वाढवणारीही असते.
-हिमांशू