नितीन गडकरी यांची माहिती
नागपूर: परंपरांगत लघू उद्योगांना चालना देण्यासाठी आपल्या मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयासोबत चर्चा करून देशातील सुमारे चारशे रेल्वे स्थानकांवर चहासाठी मातीचे कुल्हड वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मातीकाम करणाऱ्या कारागिरांना रोजगार मिळेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात दिली. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना एम.एस.एम.ई.च्या योजनाविषयी जागृत करण्यासाठी स्वयंरोजगार प्रेरणा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
आपल्या देशात अगरबत्तीची निर्यात चीन मधून होत असून, यामुळे देशातील अगरबत्ती व्यवसायावर याचा परिणाम होत होता. यावर उपाय म्हणून सरकारने आता अगरबत्तीवर तीस टक्के आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय कालच घेतला यामूळे अगरबत्ती व्यवसाय अधिक किफायतशीर होईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात एम.एस.एम.ई. क्षेत्राचा वाटा हा 29 टक्के असून याद्वारे 71 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते व 40 टक्के निर्यात या क्षेत्रातून होत असून आतापर्यंत 11 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता या क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा 50 टक्के, निर्यात 50 टक्के तर उलाढाल दीड लाखापर्यंत वाढविण्यास तसेच येत्या 5 वर्षात 5 कोटी रोजगार एम.एस.एम.ई. क्षेत्रात निर्माण करण्याचे लक्ष्य आपण ठेवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.