वायसीएममध्ये तीन वर्षांत 581 शस्त्रक्रिया ः गर्भपाताच्या गोळ्या ठरताहेत धोकादायक
– प्रकाश गायकर
पिंपरी (प्रतिनिधी) – बदलत्या जीवनशैलीचा मानवी जीवनावर आमूलाग्र बदल होत आहे. अनेक महिला घर सांभाळून व्यवसाय व नोकरी करतात. त्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत आहे. संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये गेल्या वर्षभरामध्ये गर्भपिशवी काढण्याच्या 181 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. खासगी रुग्णालयातील शस्त्रक्रिया यापेक्षा जास्त असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
गर्भपिशवीचे 70 टक्के आजार हे औषधोपचाराने बरे होतात. मात्र, महिलांच्या आरोग्याकडे आजही दुर्लक्ष केले जाते. या आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यानंतरच याकडे लक्ष दिले जाते. यातूनच महिलांवर गर्भपिशवी काढण्याची वेळ येते. वायसीएम रुग्णालयात मागील वर्षी 2019 मध्ये 181 गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
तर 2018 मध्ये सर्वाधिक 280 व 2017 मध्ये 120 महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. एकट्या महापालिकेच्या रुग्णालयात एवढी मोठी संख्या असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेबाबत आजही अनेक समज-गैरसमज आहेत. गर्भरपिशवीवरील प्रत्येक गाठ ही कर्करोगाची नसते. तसेच गर्भपिशवीवर सूज आली म्हणजे कर्करोग झाला असे नाही. त्यावर औषधोपचार उपलब्ध असून, गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेपासून वाचता येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगतिले. गर्भपिशवीचा आकार वाढणे, अतिरक्तस्राव होणे यामुळे गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करावी लागते. नॅशनल हेल्थ सर्व्हेनुसार गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया ठराविक परिस्थितीमध्येच करावी लागते.
गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण वाढत आहे. याला बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. सुमारे 80 टक्के महिलांमध्ये छोट्या गाठी असतात. हार्मोन्समधील बदलामुळे या गाठी वाढतात. अनेक महिला मासिक पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या खातात. त्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेऊ नये. योग्यवेळी योग्य उपचार घेऊन हा आजार बरा करता येतो, त्यासाठी गर्भपिशवी काढण्याची आवश्यकता नाही. महिलांनी अशा वेळी संकोच न करता वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
– डॉ. प्रसाद भानप, विभागप्रमुख प्रसूतिगृह, वायसीएम रुग्णालय.
अतिकाळजी किंवा दुर्लक्षित
काही कुटुंबातील व्यक्ती महिलांच्या आजाराकडे जास्त लक्ष देताना दिसतात, तर काही ठिकाणी दुर्लक्ष केले जाते. काही ठिकाणी थोडा त्रास सुरु झाला तर तात्काळ डॉक्टरांकडे दाखवले जाते. तसेच गर्भपिशवी काढण्याचा हट्ट धरला जातो. तसेच काही महिला छोटी गाठ असेल तरी शस्त्रक्रियेचा आग्रह धरतात. मात्र हा आजार औषधोपचरानेही बरा होणारा असतो. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले जाते. ओटी-पोटात त्रास होत असतानाही संकोच वाटत असल्याने काही महिला डॉक्टरांकडे जात नाहीत. निष्काळजीपणामुळे स्त्रिया हे दुखणे अंगावर काढतात. अशावेळी शस्त्रक्रियाही गुंतागुंतीची होते.