पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. परंतु विधानसभेची मुदत संपून गेली तरीदेखील अद्याप त्यांना सरकार स्थापन करण्यात यश आलेले नाही. भाजप आणि शिवसेनेतील दरी काही कमी होताना दिसून येत नाही. शिवसेना मुख्यमंत्री पदावरच अडून बसली आहे, तर भाजप मात्र मुख्यमंत्री पदाबाबत कुठलीही वाटाघाटी करण्यास तयार नाही. त्यामुळे हा सत्तेचा पेच कायम आहे.
विधानसभेची मुदत संपून देखील सरकार स्थापन न झाल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. परंतु बिगबॉस आणि आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढविल्यानंतर चर्चेत आलेले अभिजित बिचकुले यांनी आपण राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे.
राज्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांना पत्र पाठवून आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन बिचुकले यांनी केले आहे. तसेच येत्या दोन दिवसांत आपण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं बिचुकले यांनी या पत्रात म्हटलं आहे.
‘मी स्वत: गेली 20 वर्षे समाजकारण आणि अपक्ष राजकारण करीत आहे, हे आपणास माहिती आहेच. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील ताकदवान नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध संविधानाने दिलेला अधिकार वापरुन 2004, 2009, 2014 आणि 2019 अखेर सर्व लोकसभा आणि विधानसभा लढविल्या आहेत. मला राष्ट्रपती पद मिळावे यासाठी सुद्धा मी प्रयत्न केले होते. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक 2019 साठी मी 182 वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली’ असल्याचं बिचुकले यांनी पत्रात म्हटलं आहे.