श्रीगोंदा – तालुक्यातील आनंदवाडी येथील समर्थ गणेश यादव या पाचवीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्याला स्विफ्ट डिझायर गाडीमधून पळवून नेण्याचा डाव ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उधळला. नागरिकांनी गाडी अडवत बेदम चोप देऊन श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या दोघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नासिर गुलाब पठाण (वय 28 रा. काष्टी.ता.श्रीगोंदा) व हरिभाऊ दत्तू वाळुंज (वय 27 रा. पिंपळगाव तुर्क, ता.पारनेर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
तालुक्यातील अजनूज (आनंदवाडी) येथील समर्थ गणेश यादव (वय 11) हा रयत शिक्षण संस्थेच्या काष्टी येथील जनता विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे. बुधवारी सकाळी 9.30 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी अजनूज चौकात येऊन थांबला. त्याचेजवळ विना नंबरची स्विफ्ट डिझायर गाडी येऊन थांबली. काष्टी येथील नासिर पठाण याने गाडीत बस, तुझ्या पप्पांचे आम्ही मित्र आहोत, असे म्हणून गाडीत बसविले. आणखी दोघा अनोळखींना गाडीत बसवून त्यांना गणेशा व माळवाडी येथे सोडले.
समर्थ याला पुढे घेऊन जात असताना गाडीतील खरातवाडी येथे हरिभाऊ वाळुंज याने चाकू दाखवून आरडाओरडा केला तर चाकू पोटात खुपसील, असा सज्जड दम दिला. त्यानंतर पुढे मोठा खड्ड्यांमुळे गाडीचे स्पीड कमी झाल्याने समर्थ यादव याने गाडीतून उडी टाकली. रस्त्यालगत असलेल्या अशोक वाघमोडे यांच्या घरी जाऊन वडिलांना फोन केला. आनंदवाडी येथील महेंद्र गिरमकर यांना गाडीबाबत माहिती दिल्याने काष्टी-सिद्धटेक रोडवरील आनंदवाडी फाटा फाट्यावर महेंद्र गिरमकर आणि दहा ते पंधरा सहकाऱ्यांनी गाडी अडविली.
चौकशी केली असता गाडीत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. अधिक चौकशी करत गाडीची तपासणी केली असता गाडीमधे चाकू, दारूच्या बाटल्या, ग्लास व सुमारे आठ ते दहा वेगवेगळ्या प्रकारच्या नंबरप्लेटा व महाराष्ट्र शासन नाव असलेल्या दोन पाट्या मिळून आल्याने ग्रामस्थांनी दोघांना बेदम चोपले.
नासिर पठाण व हरिभाऊ वाळुंज या दोघांना श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलाचे वडील गणेश विठ्ठल यादव यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करीत आहेत.