पणजी – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सोमवारी आप आणि तृणमूल कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. गोव्याबाहेरील ते पक्ष केवळ विस्ताराच्या उद्देशातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत, असे त्या म्हणाल्या.
कॉंग्रेसच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत प्रियंका बोलत होत्या. स्थिर सरकारशिवाय विकास होत नाही. अस्थिर सरकार फक्त स्वत:ला वाचवण्यातच गुंतलेले असते. केवळ कॉंग्रेस पक्षच स्थिर सरकार देऊ शकतो. गोव्याला हवे ते आप किंवा तृणमूलसारखे पक्ष देऊ शकत नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. गोवा हे साधनसंपत्तीची विपुलता असणारे राज्य आहे. तसे असूनही बेरोजगारीचा सर्वाधिक दर असणाऱ्या देशातील राज्यांत गोवा दुसऱ्या स्थानावर आहे. सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी अनेक युवक भरपूर अभ्यास करतात.
मात्र, त्यांना रोजगार उपलब्ध होत नाहीत. ते चित्र प्रत्येक भाजपशासित राज्यात आहे. भाजपशासित राज्यांमध्ये केवळ बड्या उद्योगपतींना आणि व्यावसायिकांना पाठबळ दिले जाते, असा आरोप त्यांनी केला. गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होईल. त्या राज्यात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये प्रमुख लढत अपेक्षित आहे. मात्र, आप आणि तृणमूलही रिंगणात उतरल्याने गोवा निवडणूक रंगतदार बनली आहे.