नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) संसदेत मंजूर करण्यात आला असला तरी त्याला आसामी चित्रपट कलावंत अग्रदीप बरूआ आणि अपणर्अ सेन यांनी उघड विरोध केला आहे. त्यांनी गुवाहाटीत झालेल निदर्शनात सहभाग घेतला.
बरुआ म्हणाले, मी आंदोलनात सहभागी झालो असलो तरी माझा हिंसाचारावर विश्वास नाही. माझा शांततापूर्ण निदर्शनावर विश्वास आहे. कॅब मंजूर केल्याने देशाच्या बहुविविधतेला धोका पोहोचणार आहे, त्यामुळे तो रद्द करावा या मागणीवर मी ठाम आहे.
आमच्या राज्यातील बहुविविधतेच्या अनेक गोष्टीवर त्यातून घाला येणार आहे. तुमच्या मतांच्या बेगमीसाठी हे तुमच्याशी खेळत आहेत. या विधेयकाच्या समर्थनार्थ गृहमंत्री बरेच काही बोलले. पण मुस्लिम लोकसंख्या वाढत असल्याने हे विधेयक आणले आणि ते स्वीकारार्ह नाही. मी अशा ठिकाणी वाढलो की आम्ही एकत्र खेळलो. एकाच ताटात जेवलो. आम्ही एकमेकांकडे कधी हिंदु मुस्लिम म्हणून पाहिलेच नाही. असे असताना हे राजकारणी धर्माचे राजकारण कशासाठी करत आहेत, असा सवाल त्यांनी केला.
कॅब आणि एनआरसीच्या देशव्यापी अंमलबजावणीला माझा विरोध आहे. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्ही या देशाचे खरे नागरिक असाल तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही, असे सांगत आहेत. पण हे ठरवणारे तुम्ही कोण? असा सवाल चित्रपटनिर्मात्या अभिनेत्री अपर्णा सेन यांनी केला. अनेक गरीब व्यक्ती या अशिक्षीत आहेत. त्यांच्याकडे पारपत्र, जन्माचे दाखले आदी प्रमाणपत्रे नाहीत. त्यांना तुम्ही कोणत्या आधारे नागरिकत्व ठरवणार आहात, असा सवाल त्यांनी केला. स्थलांतरीतांना नागरिकत्व द्या पण ते मानवतेच्या दृष्टीकोनातून द्या. धर्माच्या आधारे नको. कारण देशाची राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे, असे त्यांनी आपल्या मुद्याच्या समर्थनार्थ सांगितले.