नवी दिल्ली – ईडीने आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नव्याने चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. हा आम्हाला धमकावण्याचा प्रकार आहे पण आम्ही असल्या धमक्यांना भीक घालत नाही असे दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी म्हटले आहे.
भाजपवर निशाणा साधत त्या म्हणाल्या की, भाजपला अरविंद केजरीवाल यांच्या कारभाराच्या मॉडेलची भीती वाटते त्यामुळेच आम आदमी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात पाठवले जात आहे. आम्हाला घाबरवण्यासाठ एजन्सींचा वापर केला जातो. पण आम्ही दबणार नाही असे त्यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले.
“सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या प्रकरणांप्रमाणे त्यांच्यावरील सर्व खटले काढून टाकले जातील. पण आम्ही भाजपला सांगू इच्छितो की आम्ही ईडी आणि सीबीआयच्या धमक्यांना घाबरणार नाही असे त्या म्हणाल्या.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी नवीन समन्स जारी केले. त्यांना २१ डिसेंबर रोज हजर राहण्यासाठी बोलावले गेले आहे. इंडिया आघाडीची बैठक आणि मोहीम यशस्वी होण्यासाठी अरविंद केजरीवाल सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.