पीकविमा योजनेतही शेतकऱ्यांची फसवणूक
औरंगाबाद – देशासह राज्यातही बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. त्याहीपेक्षा शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा आक्रोश असल्याचे या जनआशीर्वाद यात्रेत दिसले. पीकविमा योजनेत फसवणूक झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांनीच यात त्रूटी असल्याचे मान्य केले आहे. तसेच कर्जमुक्ती झालेला एकही शेतकरी मला अद्याप भेटलेला नाही. त्यामुळे केवळ होर्डिंगवर कर्जमुक्ती दिसत आहे, असे म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन जन आशीर्वाद यात्रेच्या प्रतिसादाबद्दल माहिती दिली. आदित्य ठाकरे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. मला शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागदेखील आवडतो. वरळीमधून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यापूर्वीही मालेगाव, दिग्रस मतदारसंघातून मी विधानसभा लढवण्याची तिथल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली आहे.
जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मी मतदारांचे आभार मानत आहे. त्यांची मने जिंकत असताना मी विधानसभा निवडणूक लढायला हवी की नको? याविषयी जनतेची मतं जाणून घेत आहे. लोकांचा आदेश घेऊनच मी पुढे जाणार आहे. लोकांनी लढ म्हटले तरच मी निवडणूक लढणार, असे म्हणत त्यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.