नेवासा – राज्य सरकारने वकील संरक्षण कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करुन राहूरी येथे झालेल्या आढाव वकील पती – पत्नीची खंडणीसाठी निर्घृण हत्या केल्याप्रकरणी या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) देण्यात यावा, या मागणीसाठी नेवासा येथील वकील बांधवांनी काम बंद आंदोलन करुन नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिरादार व पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांना सोमवार (दि.२९) रोजी सकाळी 11 वाजता नेवासा तहसील कार्यालयात निवेदन देवून घटनेचा तिव्र निषेध नोंदविला आहे.
यावेळी बोलतांना नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कल्याण पिसाळ म्हणाले की, मानोरी (ता.राहूरी) येथील अॅड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी अॅड. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याचा समाजकंटकांनी खंडणीसाठी अमानुषपणे निर्घुण खुन केल्याची घटना गुरुवार (दि.२५) रोजी घडलेली आहे. या घटनेचा नेवासा वकील बांधवांकडून तिव्र निषेध करण्यात येत असून या वकील दांपत्याच्या खुनातील मास्टर माईंडचा शोध पोलीसांनी घेण्याची मागणी पिसाळ केली.
यावेळी महिला वकील संघाच्या उपाध्यक्षा अॅड. उत्कर्षा मोटे म्हणाल्या की, या आढाव पती-पत्नीच्या खुनातील आरोपींना पोलीसांनी पकडलेले आहे, परंतू त्यातील काही आरोपींनी पोलीसांना कबुली जबाब दिल्यामुळे तपासामध्ये मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून या गुन्ह्यातील मास्टरमाईंड व खुनामागील सत्य बाहेर येण्यास मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे या घटनेतील गुन्ह्याचा तपास हा गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवून सदर गुन्ह्यातील मास्टरमाईंड व गुन्ह्यामागील सत्य उघड होण्यासाठी पोलीसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याची मागणी यावेळी मोटे यांनी केली.
आढाव वकील दाम्पत्याच्या खुनाचा तपास CIDकडे द्यावा; नेवासा वकील संघाची मागणी… pic.twitter.com/xdJYkaDnb5
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) January 29, 2024
सोमवारी नेवासा वकील बांधवानी काम बंद आंदोलन करुन नेवासा तहसीलदार संजय बिरादार व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदन दिल्यानंतर सामूहिकपणे वकील बांधव राहूरी येथील मोर्चाला रवाना झाले. यावेळी जेष्ठ विधिज्ञ आर.आर. येळवंडे, नेवासा वकिल संघाचे उपाध्यक्ष ॲड. वैभव वाकचौरे, सचिव अॅड. राजेंद्र नेव्हल, सहसचिव अॅड. महेश लवांडे, खजिनदार अॅड. देवदान जावळे, अॅड. संतोष शेटे, अॅड. भारतभुषण मौर्य, अॅड. अजित वाबळे, अॅड. बाळासाहेब कावळे, अॅड. बन्सी सातपुते, अॅड. जानकिराम डौले, अॅड. कैलास कापसे, अॅड. प्रदिप वाखुरे, अॅड. संदिप कोतकर, अॅड.डी.आर.काळे,अॅड. एन.एस.जोशी, अॅड. नितीन अडसुरे, अॅड. अण्णासाहेब अंबाडे, अॅड. गोकुळ भताने, अॅड. ए.टी.झिने,अॅड. कैलास राऊत, अॅड. अण्णासाहेब जाधव, अॅड. प्रसाद गर्जे, अॅड. बाळासाहेब कचरे, अॅड. सोमनाथ वाघचौरे यांसह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे सरकारचे अपयश – ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. आर. आर. येळवंडे
हल्लीच्या युगात सध्या न्यायालयामध्ये आरोपी किंवा फिर्यादी यांच्या बाजुने वकिलांनी कामकाज पाहणे मोठे धोक्याचे झालेले आहे. दुखावलेला पक्षकार वकिलांच्या जिवावर उठतो, वकिलांवर न्यायालयात व न्यायालयाच्या बाहेर जिवघेणे हल्ले झालेले आहेत. काही वकील बांधवांना आपला जिवही गमवावा लागलेला आहे. केंद्र सरकारचा वकील कायदा जरी अस्तित्वात असला तरी वकिलांचे जिवीतांचे व त्यांच्या हक्क अधिकाराचे संरक्षण करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. तसेच कायदा सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारच्या अखत्यारीतील बाब आहे. सन 2012 सालापासून खुनासारख्या गुन्ह्यातील आरोपी जर सर्रास बाहेर राहुन जर तो पुन्हा गुन्हा करीत असेल तर हे सरकारचे अपयश असल्याचे, यावेळी नेवासा न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.आर.आर.येळवंडे यांनी दैनिक प्रभात’शी संवाद साधतांना स्पष्ट केले.