राजगुरूनगर (प्रतिनिधी)- सण असू कि सुट्टीचे दिवस कि विकेंड … राजगुरुनगर शहरात वाहतूक कोंडी नित्याची ठरली आहे. हीच वाहतूक कोंडी सोडवायला आता शहरातील महिला रस्त्यावर उतरल्या. अगदी रक्षाबंधनाच्या दिवशी राजगुरूनगर शहरात पुणे नाशिक महामार्गावर पोलिसांच्या बरोबरीने महिला वर्गाने वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिसांच्या मदतीला तालुका महिला दक्षता समितीतील सदस्यांनी महामार्गावर उभे राहून वाहतूक नियंत्रक स्वयंसेवकाची भूमिका बजावली या उपक्रमाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.
मागील वर्षी रक्षाबंधन सणाच्या दिवशी फेसबुक मित्रांकडून पुणे नाशिक महामार्ग महामार्गवरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यात आली होती. मोशी ते मंचर या सुमारे ४० किमी अंतरावर फेसबुक मित्राच्या माध्यमातून वाहतूक कोडी सोडवली होती.रक्षाबंधनाचा सण, विकेंड या उपक्रमात फेसबुकवरील हजारो मित्र सहभागी झाले होते.कालही या उपक्रमात महिलां दक्षता समितीच्या महिलांनी रस्त्यावर येवून वाहतूक कोंडी सोडवण्यात वाहतूक नियंत्रकाची भूमिका बजावल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरूनगर येथे एस टी बस स्थानकाजवळ असलेल्या अरुंद पुलामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पाबळ चौक ते मार्केट यार्ड परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. येतील अरुंद पुलाच्या जवळून नाशिकच्या बाजूकडे एस टी बस बाहेर पडते आणि वाहतूक कोंडीला सुरुवात होते. मध्यंतरी या रस्त्याचे रुंदीकरण केले त्यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसला पोलीस बळ वाढले मात्र वेकेंड आणि सणासुदीला येथील वाहतूक कोंडी प्रवाश्यांच्या पाचवीला पुजलेली असते.
गुरुवारी स्वातंत्र्य दिन (१५ ऑगष्ट), आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आल्याने महामार्गावर वाहनाची संख्या वाढली आणि वाहतूक कोडी झाली. ही कोंडी वाढल्याने अनेकांना अडकून बसावे लागले. रक्षाबंधन सणाच्या दिवशी महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने सर्वच प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना याचा त्रास झाला.
यावेळी अनेक महिला व तालुका दक्षता व सुरक्षा समितीच्या महिला पोलिसांना राख्या बांधण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या हि बाब लक्षात आली आणि या रणरागिणीनी तेथेच ठरवले कि आज आपण महामार्गावर पोलिसांच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रकाची भूमिका घ्यायची. खेडचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका महिला दक्षता व सुरक्षा समितीच्या सदस्या मोहिनी राक्षे, सुप्रिया मुळूक, संगिता तनपुरे, सुरेखा कड, ज् सुनंदा गायकवाड,योती जाधव, अलका शिंदे, सिमा बोंबले यांनी वाहतूक नियंत्रक पोलिसांच्या मदतीने पाबळ चौक ते बाजार समिती पर्यंत वाहतूक कोंडी सोडविण्यास सुरुवात केली. यंदा प्रथमच रक्षाबंधनाच्या दिवशी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महिला रस्त्यावर उतरल्याने महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी त्यांचे कौतुक केले.