सातारा : वडूथ ता. सातारा येथे रविवारी सायंकाळी धावत्या कारणे अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कार चालक बचावला.
याबाबत अधिक माहिती अशी, अतुल राजेंद्र किरवे (३० रा. भीमनगर, ता. कोरेगाव) हे त्यांच्या कारमधून वडूथ वरून किरकोळ साहित्य घेऊन भीमनगर येथे निघाले होते. मोरेवस्तीजवळील कॅनॉलजवळ आल्यानंतर कारच्या बोनेट मधून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे किरवे यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. तोपर्यंत गाडीने पेट घेतला. बोनेट मधून मोठा भडका उडाला. किरवे यांनी प्रसंगावधान राखून गाडीचा दरवाजा उघडून बाहेर उडी मारली. त्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला.
आगीने गाडीला वेढले. आगीत गाडी अक्षरशा भस्मसात झाली. चार टायर, इंजिन संपूर्ण जळून खाक झाले. वडूथ गावातील विकी साबळे, हरिदास मोरे, संतोष साबळे, मंगेश बोडके, चंद्रकांत बिराजदार, उमेश साबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी टाकून पेटलेली गाडी विझवली. परंतु तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. या आगीत कारचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.