पावसाळ्यात आंधळी तलाव परिसर, कुळकजाई, बोथे, शिंदी या भागात निसर्ग खुललेला असतो. पर्यटकांना येथील निसर्ग खुणावत असल्याने पर्यटन व्यवसायास चांगला वाव आहे. त्या दृष्टीने प्रयत्न झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
गोंदवले – माण तालुक्यातील आंधळी तलाव तब्बल दहा वर्षांनंतर भरून वाहू लागले असून त्याचे विलोभनीय रूप निसर्गप्रेमींना खुणावत आहे. हा निसर्गरम्य नजारा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागल्याने परिसराला पर्यटनस्थळाचे स्वरूप आले आहे.
आंधळी तलावात गेल्या चार वर्षांत ठणठणाट होता. त्यापूर्वी झालेला अत्यल्प पाऊस आणि या तलावाच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणात झालेल्या बंधाऱ्यांमुळे आंधळी तलावात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होऊ शकला नव्हता. यंदा मात्र कुळकजाई, भांडवली, मलवडी या भागात झालेल्या मुसळधार पावसाने नदीवरील बंधारे भरून आंधळी तलावातदेखील पाणीसाठा झाला आहे.
दरम्यान, भांडवली, शिंदी, टाकेवाडी येथे पाणी फौंडेशनच्या माध्यमातून मोठी कामे करण्यात आली आहेत. त्यात तालुक्याच्या उत्तर भागात परतीच्या पावसाने जोरदार हजरी लावल्याने या भागातील बंधाऱ्यांमध्ये पाणी पातळी वाढून जादा झालेले पाण्याने आंधळी तलावात आल्याने तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. या आधी 2009 साली तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहिले होते. त्यामुळे यंदा येथील नजारा पाहण्यासाठी तालुक्यातून लोक गर्दी करत आहेत. अनेक जण सहकुटुंब सहलीचे आयोजन करून तलावाला भेट देत आहेत.