नवी दिल्ली: देशाला वेठीस धरणाऱ्या करोना संकटातही बाधित बरे होण्याचे लक्षणीय प्रमाण दिलासादायी ठरत आहे. देशात मंगळवार सकाळपासून 24 तासांत 20 हजार 572 बाधित करोनामुक्त झाले. त्याशिवाय, मंगळवारी देशभरात 3 लाख 20 हजार 161 करोनाविषयक चाचण्या झाल्या. एकाच दिवसातील चाचण्यांच्या प्रमाणाचा तो विक्रम ठरला.
मागील काही दिवसांपासून देशातील चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. देशात 14 जुलैपर्यंत 1 कोटी 24 लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या सुमारे 3 लाख 20 हजार सक्रिय बाधित आहेत. तर करोनामुक्त झालेल्या बाधितांची संख्या 5 लाख 92 हजारांपेक्षा अधिक आहे. देशात बऱ्या झालेल्या रूग्णांचे प्रमाण 63.24 टक्के इतके आहे.
उच्चांकी 29 हजार 429 नव्या बाधितांची भर
देशात मंगळवार सकाळपासून 24 तासांत 29 हजार 429 नवे करोनाबाधित आढळले. ती एकाच दिवसातील उच्चांकी भर ठरली. देशात सलग चौथ्या दिवशी 28 हजारांपेक्षा अधिक नव्या बाधितांची नोंद झाली. देशात करोना संसर्गाने आणखी 582 बाधित दगावले. त्यामुळे देशातील करोनाबळींची संख्या 25 हजारांच्या घरात पोहचली आहे.