हैदराबाद – सध्या आंध्रप्रदेशात आमच्या वडिलांनी जसे राज्य चालवले तशा प्रकारचे राज्य चालवले जात नसल्याची टीका करीत आंधप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला यांनी मुख्यमंत्र्याच्याच विरोधात बंडाची तयारी सुरू केली असल्याचे संकेत दिले आहेत.
त्या लवकरच नवीन राजकीय पक्षही स्थापन करणार असल्याचीही वदंता आहे.
त्यांचे वडिल वाय. एस. आर राजशेखर रेड्डी हे कॉंग्रेसचे राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री होते पण त्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव जगनमोहन हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. पण सध्या आपल्या वडिलांप्रमाणे राज्याचा कारभार सुरू नसल्याची जाहीर नाराजी त्यांच्या भगिनी शर्मिला यांनी व्यक्त केली आहे.
तसेच शर्मिला यांनी आपल्या वडिलांबरोबर काम केलेल्या काही ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांशीही चर्चा केली आहे.त्यामुळे त्या नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. आपण प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून राज्याची नेमकी स्थिती समजून घेणार आहोत असे शर्मिला यांनी पत्रकारांना सांगितले.
तथापि नवीन राजकीय पक्ष स्थापनेबाबत त्यांनी कोणतेही भाष्य करणे टाळले. सध्या आपण केवळ लोकांचे म्हणणे ऐकून घेत आहोत असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मी आणि आपल्या आईने सन 2019 च्या निवडणुकीत वायएसआर कॉंग्रेस पक्षाचा जोरदार प्रचार केला होता असेहीं त्यांनी नमूद केले.
या पक्षाला प्रचंड यश मिळाल्यानंतर शर्मिला या राजकारणात फारशा सक्रिय दिसल्या नव्हत्या. पण त्या आता चांगल्याच सक्रिय झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या घरात गृह कलह निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.