नवी दिल्ली – बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेले भाजपचे माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना मंजुर करण्यात आलेल्या जामीनाच्या विरोधात एका विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने दाखल केलली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्या.अशोक भुषण आणि न्या. नवीन सिन्हा यांच्या खंडपीठाने या विषयी निर्णय देताना म्हटले आहे की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वामी चिन्मयानंद यांना जामीन मंजुर करण्याचे कारण आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.
चिन्मयानंद प्रकरणाचा खटला उत्तरप्रदेशातून दिल्लीला हलवण्यात यावा अशी मागणी करणाऱ्या काही याचिका स्वतंत्रपणे दाखल करण्यात आल्या आहेत, त्या अनुषंगाने कोर्टाने आज उत्तरप्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे. बलात्कार प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाने चिन्मयानंद यांना 3 फेब्रुवारी रोजी जामीन मंजुर केला आहे.