नवी दिल्ली – निवडणुकीतील उमेदवारी अर्जात आपल्या विरोधातील दोन गुन्हांची माहिती सादर केली नाही म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. त्यांच्या विरोधात या विषयावरून खटला चालवण्यात यावा असा जो आदेश याच न्यायालयाने पुर्वी दिला होंता तोच आदेश त्यांनी आजही कायम ठेवण्याचा निर्णय देत त्या आदेशाला आव्हान देणारी फडणवीस यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.
या आदेशाचा फेरविचार करण्याचे कोणतेही सबळ कारण दिसत नाही असे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याने आता फडणवीस यांच्यावरील हा खटला चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 18 फेब्रुवारी रोजीच हा आदेश दिला होता पण तो मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस यांच्या अर्जावर गेल्यावर्षी असाच निर्णय दिला होता पण त्या निकालाचा फेरविचार करावा अशी विनंतीही फडणवीस यांनी कोर्टाला केली होती पण तीही आज अमान्य करण्यात आली.
ट्रायल कोर्टाने फडणवीस यांच्या विरोधात खटला चालवण्याचा आदेश दिला होता पण त्या अर्जाला फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात फडणवीस यांना क्लीन चीट दिली होती. त्यानंतर मुळ याचिकादार सतीश उके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उके यांचा अर्ज मान्य करून सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 125 अ नुसार गुन्हा दाखल करून खटला चालवण्याचा आदेश दिला आहे.
फडणवीस यांच्या विरोधात फसवणूक आणि फोर्जरीचे गुन्हे 1996 आणि 1998 मध्ये दाखल झाले आहेत. त्या गुन्ह्यांची माहिती फडणवीस यांनी आपल्या सन 2014 च्या निवडणूक अर्जात दिली नव्हती.त्यामुळे सन 2015 पासून उके हे त्यांच्या विरोधात ही न्यायालयीन लढाई लढत आहेत.