मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी लोकशाहीचा अर्थ आपल्या खास शैलीत सांगितला. तसेच राज ठाकरे यांनी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या या गुणवंतांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आणि महाराष्ट्र्राबद्दल आपुलकी, प्रेम कायम ठेवण्याचा सल्लाही दिला.
यावेळी राज ठाकरे यांनी लोकशाही कशाला म्हणतात, हे आज तुम्हाला कळाले असेल. ज्या व्यक्तीला दहावीत 42 टक्के पडलेत तो आज आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करतो, असे म्हंटले. यावर एकच हशा पिकला. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना एक सल्लाही दिला. “आपल्या देशाच्या पंतप्रधानांना आपल्या राज्याबद्दल प्रेम असू शकतं, तर तुम्हाला तर असलेच पाहिजे. त्यांना वाटते बऱ्याच गोष्टी आपल्या गुजरातमध्ये आल्या पाहिजेत, तसं वाटणं साहजिक आहे. प्रत्येकाच्या मनात आपल्या राज्याबद्दल प्रेम असते, तुमच्या मनातही आपल्या राज्याविषयी ठासून असलं पाहिजे. तुम्ही उद्या देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाल, पण महाराष्ट्राचा विचार तुमच्या मनातून जाता कामा नये”, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी राज ठाकरे यांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीएमडब्ल्यू कंपनीबाबतचा किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले की, “विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीएमडब्ल्यू कंपनीचा महाराष्ट्रातील प्रकल्प दक्षिणेकडील राज्यात कसा गेला होता, याची कथा राज ठाकरे यांनी रंगवून सांगितली. त्यावेळी विलासराव देशमुख यांना बीएमडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांशी बोलायला फार वेळ नव्हता. तेव्हा विलासराव देशमुख यांनी आपल्यासोबतच्या अधिकाऱ्यांना बीएमडब्ल्यू कंपनीच्या शिष्टमंडळाशी बोलून घ्यायला सांगितले. कंपनीचं शिष्टमंडळ आल्यानंतर विलासराव देशमुखांनी त्यांच्याशी चर्चा केली. पण बैठकीला सुरुवात झाल्यापासून विलासराव देशमुख प्रकल्पासाठी लागणारी जमीन, सवलती अशा प्रत्येक मुद्द्यावर नकार दिला जाऊ लागला. त्यामुळे बीएमडब्ल्यूचे शिष्टमंडळ निघून गेले.”
“त्यावेळी विलासराव देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या एका दाक्षिणात्य अधिकाऱ्याने तामिळनाडूतील त्याच्या सहकाऱ्याला फोन लावला. या अधिकाऱ्याने बीएमडब्लूच्या अधिकाऱ्यांचे फोन नंबर आणि इतर माहिती तामिळनाडूतील सहकाऱ्याला दिली. बीएमडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना आत्ता बोलावून घ्या आणि त्यांच्याशी चर्चा करा, असे त्याने सांगितले. त्यानंतर बीएमडब्ल्यूचा कारखाना तामिळनाडूत गेला,” असे राज ठाकरे यांनी सांगितले.