पिंपरी – महापालिकेने वल्लभनगर येथे दहा वर्षांपूर्वी उभारलेला पादचारी पूल काढण्यात येणार आहे. सध्या हा पूल पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलावर झालेल्या कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे. महामेट्रोने येथील स्थानकासाठी उभारलेला पूल हाच आता नागरिकांना देखील महामार्ग ओलांडण्यासाठी पर्यायी पूल म्हणून खुला करण्यात आला आहे.
वल्लभनगर येथे 3 कोटी 62 लाख रुपये खर्च करून दहा वर्षांपूर्वी पुणे-मुंबई महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पुल उभारण्यात आला होता. हा पूल आता काढण्यात येणार आहे. केबल्सच्या रोपच्या सहाय्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हा पादचारी पुल उभारलेला होता.
वल्लभनगर येथील पादचारी पुल मेट्रोच्या वायोडक्टला अडथळा ठरत असल्याने काढण्यात यावा, असे महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला कळविण्यात आले होते. नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत हा पादचारी पुल तसाच ठेवण्यात यावा, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली होती.
दरम्यान, आता महामेट्रोकडून वल्लभनगर येथील स्थानकासाठी पादचारी पूल उभारण्यात आलेला आहे. तसेच, हा पूल पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे आता महापालिकेने उभारलेला पूल काढण्यात येणार आहे. तशा आशयाचा फलकच संबंधित पादचारी पुलाच्या येथे लावण्यात आला आहे. महामेट्रोकडूनच हा पूल काढण्यात येणार आहे.
महापालिकेने वल्लभनगर येथे उभारलेल्या पादचारी पुलाची उंची खूप जास्त आहे. मेट्रोच्या वायोडक्टला तो अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा पूल काढावा लागणार आहे. तांत्रिकदृष्ट्या त्याचा पुर्नवापर करणे शक्य नाही. तथापि, महामेट्रोकडून वल्लभनगर येथे स्थानकासाठी उभारलेला पादचारी पूल नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी देखील खुला राहणार आहे. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होणार नाही.
– बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता, महापालिका.