नवी दिल्ली : करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतात अनेक गोष्टींवर निर्बध लादण्यात आले होते. त्यातच नियमित रेल्वे गाड्यांवरही निर्बंध लादत बंदी घालण्यात आली होती. नियमित रेल्वेऐवजी सरकारद्वारे विशेष रेल्वे चालवली जात होती. परंतु आता देशातील करोनाची लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. त्यामुळे देशात अनेक बाबतीत शिथिलता देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे रेल्वे मंत्रालयानेदेखील मोठा निर्मया घेतला आहे.
रेल्वे मंत्रालयाने विशेष रेल्वे या पुन्हा नियमित गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये १७०० पेक्षा अधिक ट्रेन या नियमित ट्रेन म्हणून पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत.जारी करण्यात आलेल्या सर्क्युलरनुसार आता प्री कोविड असलेले तिकिटदर लागू करण्यात येणार आहे. याचाच अर्थ ज्या विशेष तिकिट दरानुसार रेल्वे सुरू होत्या त्याचे दर आता सामान्य होणार आहेत. त्याप्रमाणे आता आता जनरल तिकिट असलेली सिस्टम संपणार आहे.
आता केवळ रिझर्व्ह आणि वेटिंग तिकिट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळणार. जनरल क्लासचे कोणतेही तिकिट आता मिळणार नाही. तसेच यापूर्वी बुक करण्यात आलेल्या तिकिटांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसंच कोणतेही पैसे परतही करण्यात येणार नाही.
करोना काळात करण्यात आलेले बदल आता हळूहळू कमी करण्यात येत आहे. परंतु करोनाचे प्रोटोकॉल मात्र पाळावे लागणार आहे. नियम तोडल्यास संबंधितांवर कारवाईदेखील केली जाणार आहे. २५ मार्च २०२० रोजी रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मात्र मालगाड्या आणि श्रमिक ट्रेन्स सुरू करण्याला परवानगी देण्यात आली होती. परंतु त्यानंतर विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात आली होती. तसंच नियमित ट्रेनचे क्रमांकही बदलण्यात आले होते. परंतु आता पुन्हा एकदा कोविडपूर्व स्थिती येणार आहे. विशेष ट्रेनची सेवा आता बंद केली जाणार असून तिकिट दरही पूर्वीप्रमाणेच असतील.