– विलास बांदल
वेल्हे -वेल्हे तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींचे अपवाद वगळता उर्वरित 26 ठिकाणी सरपंचपदासाठी एकास एक लढत होणार आहेत. सदस्यपदासाठी काही अपवाद वगळल्यास सर्वाधिक सदस्य बिनविरोध झाले आहेत. ग्रामपंचायती सरपंचपदासह बिनविरोध करण्यासंदर्भात गाव पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले;
परंतु काही ठिकाणी अतिउत्साह, तर काही ठिकाणी अंतर्गत वादामुळे या निवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत. प्रत्यक्ष गावाकडे राहणारे आणि शहरात राहणारे यांच्यातील स्पर्धासुद्धा यास कारणीभूत ठरली आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
हे जरी खरे असले तरी ज्यांनी ग्रामविकासाचा कोणताही विचार न करता निवडणूका लादल्या आणि गावचा एकोपा टिकविण्यासाठी आडकाठी आणली अशा उमेदवारांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. गावागावांत वाड्यावस्त्यांमध्ये वादविवाद होण्याचीही शक्यता अधिक आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य बिनविरोध निवडणून आले आहेत त्या ठिकाणी त्याच गटाकडे सरपंचपद जाण्याची शक्यता अधिक आहे. कारण लोकांना स्थानिक ठिकाणी राहून अडचणी सोडवणारा हवा आहे.
तालुक्यामध्ये होत असलेल्या सरपंच व सदस्यपदासाठीच्या निवडणुकीमध्ये दलित संघटनांनी घेतलेल्या निर्णयाचे निवडणूक बिनविरोध करण्यात मोठे योगदान ठरले आहे. ज्या आरक्षित ठिकाणी निवडणूक लागेल अशा ठिकाणी आपसात लढण्यापेक्षा कार्यकर्त्यांना संयमाची भूमिका घेण्यास सांगून आरक्षित जागांसह अनेक ठिकाणी सर्वसाधारण जागेवर दलित चेहरे बिनविरोध निवडून आणण्यात या संघटनांनी यश मिळविले.
मुळात या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी तालुका पातळीवरील सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रयत्न होणे अपेक्षित असताना लोकांना झुलवत ठेवत याच नेत्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने गावागावांत सरपंचपदाच्या झुंजी लावून दिल्या आहेत.
– विनोद गायकवाड, अध्यक्ष, भीम आर्मी, वेल्हे
मुळात गाव पातळीवर काम करत असताना प्रशासकीय अनुभव असणे गरजेचे आहे, त्यासाठी वेळ दिला गेला पाहिजे. हे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी ठरवले पाहिजे अनुभव नसताना काम करणे कठीण आहे.
– खंडू गायकवाड, माजी उपसरपंच, वेल्हे