पुणे – राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग हा “टीईटी’ घोटाळ्यामुळे बदनाम झालेला आहे. या विभागाचे महत्त्वाचे असलेले प्रधान सचिव पद रिक्त पडले आहे. कर्तुत्वाने नामांकित असलेल्या बड्या “आयएएस’ अधिकाऱ्यांना या पदावर आणण्यासाठी चाचपणी सुरू झालेली आहे. मात्र, या पदावर कोणी येण्यास फारसे इच्छुक नसल्याने मोठी पंचाईत होऊन बसली आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा या 28 फेब्रुवारी 2022 रोजी सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यानंतर या सचिव पदावर अद्याप कोणाचीही पूर्णवेळ नियुक्ती झालेली नाही. या पदाचा अतिरिक्त कार्यभार उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.
शालेय शिक्षण विभागासाठी प्रधान सचिव, अप्पर मुख्य सचिव, सचिव यापैकी कोणत्याही एका तरी पदावर तातडीने पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्याची आवश्यकता आहे. सचिव पदासाठी तत्कालीन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना विचारणा झाली होती. मात्र, त्यांनी नकार दिला आहे. सचिव पदासाठी डॅशिंग, प्रशासकीय कामकाजावर पकड असलेले, निर्णय क्षमता असलेले अधिकारी मिळावेत यासाठी शालेय शिक्षण विभागाने जलद गतीने शोधाशोध सुरू ठेवलेली आहे. यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम यांच्यासह अश्विनी भिडे या बड्या अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, यांच्याकडून अद्याप स्पष्ट होकार आलेला आढळत नाही. त्यात या दोन्ही अधिकाऱ्यांनी पूर्वी शालेय शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे. त्यामुळे ते पुन्हा आता सद्य:स्थितीला शालेय शिक्षण विभागात काम करण्यास तयार होतील का याबाबत साशंकताच वर्तविण्यात येत आहे.
काही अधिकारी कौटुंबिक कारणामुळे आपले सोयीचे व नामांकित शहर सोडून मुंबई मंत्रालयात कटकटीच्या ठिकाणी जाण्यास तयार नाहीत असेही बोलले जात आहे. यामुळे आता सचिव पदावर नक्ती कोणाची वर्णी
लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.