आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी येथील प्रमुख रस्ता रेड लाईट एरिया बनला आहे. या रस्त्यावरून मुलींना, महिलांना ये-जा करणे कठीण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी आळंदीतील ग्रामस्थ महिला, पुरुषांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत या घटनेला आळा घालण्याची प्रशासनाकडे मागणी केली होती. काही दिवस हे प्रमाण कमी झाले होते मात्र आता पुन्हा शहरातील प्रमुख रस्त्यावरील वेश्या व्यवसाय गंभीर समस्या बनली आहे.
आळंदी हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी येथे राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. पुण्याहून आळंदीत येणारा देहू फाटा ते माऊली मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर देहविक्री करणाऱ्या महिलांचा दिवसा आणि रात्रीच्या वेळी वावर वाढला आहे. हा आळंदीतील प्रमुख रस्ता असल्याने येथून नागरिक, भाविक ये-जा करतात. मात्र या रस्त्यावरून मुलींना, महिलांना फिरणे कठीण झाले आहे. अनेकदा त्यांच्याकडेही वाईट नजरेने पाहिले जात आहे. यावरून अनेकदा वाद झाले आहेत.
रविवारी (दि. 5) सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान एक महिला चाकण चौकातून देहू फाटाकडे जात असताना एका तरुणाने महिलेला ‘कितने रुपये लेती हो’ असे विचारले. त्यावेळी ती महिला घाबरून धावत गेली. या घटना वारंवार घडत आहेत. थोड्याशा पैशांसाठी कोणीही या प्रकारांना पाठबळ देऊ नये, शहरातील लाॅंज व्यावसायिकांनी या महिलांना प्रवेश देऊ नये, लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासनाने आमची अब्रू वाचवावी, अशी आर्त हाक महिला देत आहेत.
“गेली तीन-चार वर्षांपासून आळंदी शहरात देहविक्रय करणाऱ्या महिलांचा उपद्रव वाढला आहे. सामान्य स्त्रीयांना रस्त्याने फिरणे कठीण झाले आहे. त्यांच्याकडेही वाईट नजरेने पाहिले जात असून विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत आहे. काही महिन्यांपूर्वी यासंबंधी आंदोलन केले होते. त्यानंतर काही प्रमाणात देहविक्रय करणाऱ्या महिलांचे रस्त्यावर थांबणे बंद झाले होते. मात्र आता पुन्हा गैरप्रकार सुरु झाले असून याचा आळंदीकर ग्रामस्थ, भाविक, महिलांना मोठा त्रास होत आहे. वरिष्ठ पोलिसांनी यात लक्ष घालून आया-बहिणींची अब्रू वाचवावी, ही प्रशासनाकडे कळकळीची विनंती, स्थानिक पोलिसांनी यावर बंदोबस्त न केल्यास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करणार आहोत.” – आळंदी विकास युवा मंच