बंगळुरू – भारतीय संघसाला लाभ होइल अशाच खेळपट्ट्या बीसीसीआय तयार करते असे आरोप केलेल्या ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू इयान हिली यांना भारताचा कसोटीपटू व्यंकटेश प्रसाद याने टोला लगावला आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेसाठी दाखल झाल्यावर तूम्ही तरी काय वेगळे करता, तूमच्याच गोलंदाजांना लाभ होइल अशाच खेळपट्ट्या तयार करण्यावर तूमचा भर असतो, अशा शब्दात प्रसाद यांनी हिली यांच्यासह ऑस्ट्रेलिया संघातील अनेक खेळाडूंचा समाचार घेतला आहे.
हिली यांच्यासह स्टिव्हन स्मिथ, मार्नस लेबुशेन व उस्मान ख्वाजा यांनीही बीसीसीआयवर टीके केली होती. मात्र, घरच्या मैदानावर खेळत असलेल्या प्रत्येक संघाला त्यांच्याच पसंतीच्या खेळपट्ट्या करण्याचा हक्क असतो. याला कदाचित अधिकृत मान्यता नसेलही मात्र, तरीही आपल्या संघाची ताकद ओळखून खेळपट्टी तयार केली जाते व हे ऑस्ट्रेलियापेक्षा अन्य कोणालाही चांगल्या प्रकारे समजणार नाही, असा टोलाही प्रसाद यांनी लगावला आहे.
2018-19 साली जेव्हा बारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा विक्रम साकार केला होता, त्यावेळीही प्रत्येत सामन्याची खेळपट्टी ऑस्ट्रेलियाला लाभ होइल अशीच तयार करण्यात आली होती. मात्र, तरीही भारतीय संघाने ही मालिका जिंकली होती, हे हिली आणि कंपनी विसरले का, असा सवालही प्रसाद यांनी केला आहे.
बीसीसीआय सरावासाठी वेगळी व प्रत्यक्ष सामन्यासाठी वेगळी खेळपट्टी देते व फसवणूक करते असे वक्तव्य हिली यांनी केले होते. तसेच याच कारणामुळे यंदाच्या मालिकेपूर्वी आम्ही सराव सामना खेळण्यास नकार दिला असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, प्रसाद यांनी हा दावा हास्यस्पद असल्याचे म्हटले आहे. हिली ऑस्ट्रेलियाच्या संघात असतानाही त्यांच्या देशात आम्हाला कशा सुविधा व खेळपट्ट्या मिळाल्या होत्या त्याचे आत्मपरिक्षण करावे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ व त्यांचे संघ व्यवस्थापनही यावर जास्त चांगले बोलु शकेल, असेही प्रसाद म्हणाले.
पाच वर्षांनंतरचा दौरा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या गुरुवारपासून बॉर्डर-गावसकर करंडकासाठीची चार कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 2017 सालानंतर प्रथमच भारतात कसोटी मालिका खेळणार आहे. 2004 पासून ऑस्ट्रेलियाने भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. आता पाच वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया भारतीय संघाला भारतात पराभूत करण्याची किमया साधणार की भारतीय संघच विजयाची परंपरा कायम राखणार हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.