पुणे – कुटुंबासोबत झालेल्या किरकोळ भांडणावरून अपहरण करून खून करणाऱ्या तिघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 21 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
राजू जमुना चौधरी (वय 28, रा. नाना रायकर चाळ, धायरी), सोन्या ऊर्फ दीपक सुरेश कडू (वय 28) आणि आण्णा ऊर्फ सुरेश मंजुनाथ शेट्टी (वय 40, दोघेही, रा. धायरी) अशी त्या तिघांची नावे आहेत. विश्वनाथ मुसे यादव असे खून झालेल्याचे नाव असून, याबाबत त्यांची पत्नी सरोजना (वय 50, रा. नाना रायकर चाळ, धायरी, मूळ. उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी 17 साक्षीदार तपासले. स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला.
सिंहगड पोलीस स्टेशनचे पोलीस ज्ञानोबा महानवर यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. 2 नोव्हेंबर 2016 रोजी ही घटना घडली. फिर्यादी आणि आरोपी राजू चौधरी एकाच चाळीत राहण्यात आहेत. फिर्यादी आणि चौधरी यांच्या कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता.
त्यावेळी चौधरी याने घरातील गरम कुकर विश्वनाथ आणि त्यांच्या मुलाला मारण्यासाठी घेतला होता. विश्वनाथ यांनी तो अडविल्याने चौधरी याच्या चेहरा, हाताला कुकर लागल्याने भाजले होते. या कारणावरून कडू आणि शेट्टी या दोघांशी संगणमत करून चौधरी याने विश्वनाथ यांना मारहाण केली.
अपहरण करून नेत त्यांचा खून केल्याचे दोषारोपपत्रात नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात तिघांना अधिकाधिक शिक्षा देण्याचा युक्तीवाद ऍड. विलास घोगरे पाटील यांनी केला.