नगर, (प्रतिनिधी) – ऊस वाहतुक करणार्या ट्रॅक्टर चालकास मारहाण करून लुटणारी टोळी स्थानक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टरसह ११ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख (वय 30, रा. अंबिकानगर, कोल्हार बु, ता. राहाता), शकिल नजीर शेख (वय २४), विशाल सुनिल बर्डे वय २६, अक्षय श्रीराम जमधडे (वय २०), तोघे रा. अंबिकानगर, कोल्हार बुा, ता राहाता), सोहेल नसीर शेख (वय २०, रा. पिंजारगल्ली बाजारतळ, कोल्हार बु .ता. राहाता), विवेक लक्ष्मण शिंदे (वय २६, रा. टाकळीभान ता. श्रीरामपुर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे आहेत.
त्यांच्याकडे चौकशी केली असता श्रीरामपूर तालुक्यातील खोकर फाटा, व भानसहिवरा ता. नेवासा येथील दोन्ही गुन्हे त्यांचा फरार साथीदार राहुल आहेर,(पुर्ण नांव माहित नाही. रा. भोकर, ता. श्रीरामपुर), याचे मदतीने केला असल्याचे सांगितले. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपींना हजर करण्यात आले आहे.
यातील आरोपी ईकबाल उर्फ सोन सिकंदर शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द नगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खून, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणणे, शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे १६ गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी अल्लाउद्दीन इब्राहिम शेख याचेविरुध्द जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी असे ४ गंभिर गुन्हे दाखल आहेत.
या बाबत हकीगत अशी सोमवार (दि.१९) रोजी किशोर दत्तात्रय धिरडे (रा. भेर्डापुर, ता. श्रीरामपुर) हे महांकाळवडगांव येथुन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ऊस भरुन घेवुन अशोकनगर साखर कारखाना श्रीरामपुर येथे जात असतांना खोकर फाटा येथे ट्रॉलीचे टायर पंचर झाल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली रोडचे कडेला उभा करुन थांबलेले होते. त्यावेळी काळे रंगाचे कारमधुन ४ अनोळखी आरोपींनी फिर्यादीस हत्याराचा धाक दाखवुन ट्रॅक्टर बळजबरीने चोरुन नेला.
याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीनुसार आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, संतोष खैरे, रणजित जाधव, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, किशोर शिरसाठ, उमाकांत गावडे, व अरुण मोरे यांनी केली आहे.