Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या टीकेनंतर काका-पुतण्यामधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी, ”वय झाल्यानंतर आपण थांबायचे असते. काहीजण सत्तरी झाली की थांबतात.
काहीजण वय 75 झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही”, असा टोला शरद पवार यांना लगावला आहे. कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी अजित पवार बोलत होते.
दरम्यान, अजित पवारांच्या या टीकेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘बापाला रिटायर करायच नसतं…बाप हा बाप असतो , बाप कधी रिटायर होत नसतो…बाप कुटुंबातील ऊर्जा स्रोत आहे.’ असा टोला जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना दिला आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले…..
‘बहुजनांच्या कल्याणासाठी आपण सत्तेत गेलो आहोत. वय झाल्यानंतर आपण थांबयच असतं. काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय 75 झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. आम्ही देखील 5 वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. राष्ट्रवादीचे सर्व नेतेमंडळी चांगल्या प्रकारे काम करत आहे.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.