नवी दिल्ली- युद्ध रोखण्याच्या क्षमतेतूनच शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते. जगाच्या इतिहासात अनेक देशांचा उत्कर्ष आणि ऱ्हास आपण पहिला, या चढउतारांनी आपल्याला हाच धडा दिला आहे की केवळ शांततेची इच्छा असण्यातून शांतता प्रस्थापित केली जाऊ शकत नाही, तर त्यासाठी युध्द रोखण्याची क्षमता आपल्याकडे असावी लागते, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी “भारताची राष्ट्रीय सुरक्षा-एक दशक पुढे’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय वेबिनारमध्ये ते बोलत होते.
शांतता असण्याच्या केवळ इच्छेला समोरून तसा प्रतिसाद मिळाला नाही, तर देशांची शांतता, सुरक्षितता आणि सार्वभौमत्वाच्या मुद्द्यांवर संघर्ष उभे राहतील आणि आपण जगात सौहार्दाचे वातावरण निर्माण करु शकणार नाही.,असे राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी भारताच्या भविष्यातील राष्ट्रीय सुरक्षेला मार्गदर्शक ठरतील अशी चार तत्वे सांगितली. पहिले तत्व म्हणजे, बाह्य धोके आणि अंतर्गत आव्हानांपासून भारताची प्रादेशिक एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्याची क्षमता.
दुसरे तत्व म्हणजे भारताचा आर्थिक विकास आणि पर्यायाने देशाच्या उभारणीसाठी आणि स्त्रोत निर्माण करण्यास पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच वैयक्तिक आकांक्षापूर्तीसाठी देशात सुरक्षित आणि स्थिर वातावरण निर्माण करणे. तिसरे, आपल्या सीमांच्या पलीकडेही जिथे आपले लोक वास्तव्य करतात आणि आपले सुरक्षाविषयक हितसंबध निगडीत आहेत, अशा ठिकाणी आपल्या हितांचे रक्षण करण्यास आपण दृढ आणि सक्षम असायला हवे. आणि चौथे तत्व म्हणजे, आजच्या जागतिकीकरणाच्या आणि एकमेकांशी जोडलेल्या जगात, आपले सुरक्षाविषयक हितसंबंध इतर देशांच्या सुरक्षा आणि सामाईक हितसंबंधांशी निगडीत आहेत, यावर भारताचा विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले.
जे देश, त्यांचे राष्ट्रीय धोरण म्हणून, दहशतवादाला प्रोत्साहन आणि संरक्षण देतात, अशा देशांना रोखण्यासाठी, याआधी अशक्य वाटणाऱ्या पर्यायांचाही अवलंब केला जाऊ शकतो, हे भारताने सिद्ध केले आहे. पाकिस्तान दहशतवादाचा वापर करणाऱ्या हटवादी भूमिकेवर ठाम आहे, मात्र भारताने समविचारी देशांची अशा धोरणांविरुद्ध एकजूट निर्माण करण्यात यश मिळवले आहे, त्यासाठी भारताने आपल्या धोरणात केलेले बदल महत्वाचे ठरले, असे राजनाथ सिंह म्हणाले.