नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे भारतात 84 दिवसांचे प्रदीर्घ लॉक डाऊन होते. या काळात घर चालविण्यासाठी तब्बल 46 टक्के भारतीयांना उसनवारी करावी लागली. होम क्रेडिट इंडिया या कंपनीने या कालावधीत भारतीय कुटुंबाच्या आर्थिक घडामोडीचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
बहुतांश उद्योगांमध्ये पगारात कपात करण्यात आली. त्याचबरोबर काही लोकांना आपले रोजगार गमवावे लागले. मध्यम उत्पन्न असलेल्या वर्गाला याचा भयंकर त्रास झाला. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी या कुटुंबांना उसनवारी करावी लागली असल्याचे दिसून आले.
घरातील जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बऱ्याच कुटुंबांनी या काळात कर्ज घेण्याचा मार्ग निवडला. तर काही कुटुंबांनी कर्जाचे हप्ते देण्यासाठी कर्ज घेतल्याचा प्रकार घडला. बऱ्याच कुटुंबांना कुटुंबप्रमुखाचे काम गेल्यामुळे त्यांना दरम्यानच्या काळामध्ये घर चालविण्यासाठी उसनवारी करावी लागली.
अशा प्रकारच्या कठीण प्रसंगांमध्ये बॅंकांकडून कर्ज मिळविणे अवघड असते. कारण त्यामध्ये अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे या काळातील गरजा भागविण्यासाठी मित्र, नातेवाईक यांचा आधार घेण्यात आला. आता ज्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे असे कुटुंबीय उत्पन्न पूर्वीच्या पातळीवर यावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे उसनवारीचे व्यवहार कुटुंबातील कर्त्या पुरुषाने अधिक प्रमाणात केले असल्याचे दिसून आले.