शिमला – हिमाचल प्रदेशचे वनमंत्री राकेश पठाणिया यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले असून त्यामुळे गहजब निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. पठाणीया म्हणाले की, देश विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सुरक्षित आहे. या करोना महामारीच्या काळात कॉंग्रेस नेते राहुल गांधी मोदी यांच्या ऐवजी देशाचे पंतप्रधान असते, तर कोरोना रुग्णांची संख्या वाढली असतीच; शिवाय कोरोनाबाधेने होणाऱ्या मृतांची संख्याही झपाट्याने वाढली असती.
पठाणिया यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसच्या विविध नेत्यांनी पठाणिया यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवले असून आपण मोदींमुळेच कोरोना मृत्यू रोखू शकलो असल्याचेही ते म्हणाले. कांग्रा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पठाणिया यांनी हे वक्तव्य केले आहे. फ्रान्स, इटलीसारखे अनेक देश कोरोनामुळे उध्वस्त झाले. या देशातील कोरोना मृत्यूदर प्रचंड आहे. मात्र, भारतातील मृत्यूदर हा कमी असल्याचेही पठाणिया म्हणाले.
हिमाचलल प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार असल्याचाही दावाही त्यांनी केला. कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहे. हिमाचलचा मुख्यमंत्री कोण होईल, याचा वाद कॉंग्रेसमध्ये सुरू आहे. त्यामुळे राज्यात आम्ही सत्तेत येणार, असा दावा पठाणिया यांनी केला.