लिंबडी – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला टीकेचे धनी केले. ते गुजरातेतील लिंबडी विधानसभा पोट निवडणुकांच्या प्रचार सभेत बोलत होते. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती ‘भगवान भरोसे’ असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
“आम्ही गुजरातेत कोरोना परिस्थिती आटोक्यात ठेवली. बाजूचं राज्य असलेल्या महाराष्ट्रात कोरोनामुळे ४५ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले. महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये कोरोना बेड्स उपलब्ध नाहीत, तिकडे रुग्ण रस्त्यावर हिंडतात. कोरोनाबाधितांचे मृतदेह महाराष्ट्रात रस्त्याच्या कडेला पडलेले सापडतात.” असा आरोप रूपाणी यांनी केला.
यावेळी त्यांनी गुजरातेतील कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार यशस्वी ठरल्याचा दावा करताना, “राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा बेड्सची संख्या अधिक आहे, इथं कोरोना बेड्सचा कसलाच तुटवडा नाही. आपल्याकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के तर मृत्यूंचे प्रमाण केवळ २.२५ टक्के एवढं आहे. मृतांची टक्केवारी अजूनही खाली पडत आहे. राज्यात कोरोनावरील महागडी इंजेक्शन्स आणि औषध मोफत देण्यात आली आहेत.” असं वक्तव्य केलं.
“राज्यात भाजप सरकार असणं गुजराती लोकांसाठी भाग्यकारक ठरलं आहे. इथे जर काँग्रेसची सत्ता असती तर महासाथीमध्ये सर्वत्र सावळा गोंधळ उडाला असता.” असंही रूपाणी म्हणाले.