जम्मू – जम्मू-काश्मीरला जोपर्यंत पूर्वीचा विशेष राज्याचा दर्जा प्रदान केला जात नाही तोपर्यंत आम्ही तिरंगा राष्ट्रध्वज हाती घेणार नाही, असे वक्तव्य पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी जम्मू-काश्मीर भाजप नेत्यांनी केली आहे. त्या पक्षाने म्हटले आहे की, जगातील कोणतीही शक्ती आता पुन्हा 370 कलम येथे लागू करू देणार नाही.
प्रदेश भाजपचे अध्यक्ष रवींद्र रैना म्हणाले की, राज्यपालांनी मेहबुबा यांच्या या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक केली पाहिजे. आम्ही या राज्यात राष्ट्रध्वजाचाच मान कायम राखू त्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देऊ, या राज्यात आता जम्मू-काश्मीरचा नव्हे तर भारताचा तिरंगाच कायम फडकत राहिला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. असली विधाने करून काश्मिरातील जनतेला पुन्हा भडकावण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असे ते म्हणाले.
जर काश्मिरी लोकांना भारतात असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी सरळ पाकिस्तान किंवा चीनला जावे, असे विधानही त्यांनी केले. भाजपच्या राज्यात देशातील कोणालाच सुरक्षित वाटत नाही, दलित आणि अल्पसंख्याकांना भारतात सन्मानाने राहणे मुश्किल बनले आहे असे विधान मेहबुबा मुफ्ती यांनी केले होते. त्यांच्या या विधानालाही रैना यांनी तीव्र आक्षेप घेतला.