इटानगर – सध्याचा काळ हा 1962 पेक्षा वेगळा आहे हे चीनने लक्षात घेतले पाहिजे. चीनने आमच्या प्रदेशावर कितीही दावा सांगितला तरी या राज्यातील जनता आणि भारतीय लष्कर त्यांच्या दाव्याला जराही किंमत देत नाही असे विधान अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी केले आहे.
1962 च्या युद्धात शहीद झालेल्या जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी बुमला पास येथे भारत-तिबेट सीमेवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. चीनला इशारा देताना ते पुढे म्हणाले कीे, आम्ही आता पुरेसे सिद्ध झालो आहोत. जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत सर्वत्र आमची चोख तयारी झाली आहे. हे 1962 साल राहिलेले नाही तर हे 2020 साल सुरू आहे. हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले. अरुणाचल प्रदेशची सारी जनता भारतीय लष्कराच्या मागे ठामपणाने उभी राहील असेही त्यांनी नमूद केले.
चीनने अरुणाचलप्रदेशला कधीच भारताचा भाग मानलेला नाही, अरुणाचल प्रदेश हे राज्य तिबेटचाच दक्षिणेकडील भाग आहे अशी चीनची भूमिका आहे ती भारताने वेळोवेळी फेटाळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चीन सीमा भागात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत असेही त्यांनी नमूद केले.