पाटणा – राष्ट्रीय पक्षांची बिहारमधील मतांची टक्केवारी गेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये वाढलेली दिसत आहे. निवडणूक डेटा विश्लेषणानुसार, भाजपाने यामध्ये बाजी मारलेली दिसत असून दोन अंकी संख्या गाठणारा बिहारमधील एकमेव राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. नोव्हेंबर 2000 मध्ये झारखंड बिहारपासून वेगळं झाल्यानंतर राज्यात एकूण चार विधानसभा निवडणुका झाल्या आहेत.
बिहार निवडणुकीत सहा राष्ट्रीय पक्षांची एकूण मतांची टक्केवारी पाहिली तर 2005 मधील 23.57 टक्क्यांपासून ते 2015 मध्ये 35.6 टक्क्यांवर पोहोचली आहे. एनडीएच्या कार्यकाळात बिहारचं विभाजन झाल्यानंतरही भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे. 2005मध्ये मतांची टक्केवारी 10.97 टक्के होती, जी 2015 मध्ये 24.42 टक्क्यांवर पोहोचली. यामागील एक महत्त्वाचं कारण म्हणजे 2015 मध्ये भाजपाने एकूण 157 जागांवर निवडणूक लढवली होती.
2015 मधील विधानसभा निवडणूक वगळाच भाजपा जेडीयूसोबतच लढली आहे. इतर पक्षांनीही जास्त जागांवर निवडणूक लढली होती, मात्र त्यांच्या मतांच्या टक्केवारीत जास्त वाढ झाली नाही.
रणनीती आखत बसपाने 2015 मध्ये सर्वाधिक 228 जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी भाजपाने 157, सीपीआयने 98, सीपीएमने 43, कॉंग्रेसने 41 आणि एनसीपीने 41 जागांवर निवडणूक लढवली. पण कॉंग्रेस वगळता इतर सर्व पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत घट झालेली पाहायला मिळाले.
भाजपाने 2005मध्ये 102 जागांवर उमेदवार दिले होते. 2015मध्ये ही संख्या 157 होती. त्यावेळी त्यांची मतांची टक्केवारी 10.97 वरुन 24.42 टक्क्यांवर पोहोचली होती. कॉंग्रेसने 2010 मध्ये सर्वाधिक 243 आणि 2015 मध्ये फक्त 41 जागांवर उमेदवार दिले. 2005मध्ये 5 टक्के असणारी मतांची टक्केवारी मात्र 8.37 टक्के झाली होती.