नवी दिल्ली – सुशांतसिंह याच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्ही व टाईम्स नाऊ या दोन वाहिन्यांनी अत्यंत बेजबाबदार व बिनबुडाच्या बातम्या प्रसारित करून हिंदी चित्रपटसृष्टीची व त्यातील कलाकारांची बदनामी केली असून या वाहिन्यांना असे बेजबाबदार वार्तांकन करण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारी एक याचिका निर्माते व कलाकारांच्या संघटनांच्यावतीने दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी आणि टाईम्स नाऊ वाहिनीचे राहुल शिवशंकर आणि नाविकाकुमार यांना यात प्रतिवादी करण्यात आले आहे. करण जोहर यांची यशराज कंपनी यांचाहीं या याचिकाकर्त्यांमध्ये समावेश असून हिंदी चित्रपटसृष्टीतील चार संघटना आणि 34 निर्मात्यांनी संयुक्तपणे ही याचिका दाखल केली आहे.
त्यात अमिर खान, शाहरूख खान, सलमान खान या आघाडीच्या अभिनेत्यांचाही समावेश आहे. या वाहिन्यांना बॉलीवूड मधील कलाकार, निर्माते आणि इंडस्ट्रीच्या अन्य सदस्यांविषयी बदनामीकारक आरोप करण्यास मनाई करावी अशी प्रमुख मागणी यात करण्यात आली आहे.
चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींची मीडिया ट्रायल करण्यास या वाहिन्यांना बंदी घालावी अशीही मागणी यात करण्यात आली आहे. चित्रपटसृष्टीतील व्यक्तींच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा या वाहिन्यांना काहींही अधिकार नसून त्यांच्या एकूणच बेपर्वाईच्या वृत्तीला आळा घातला जावा अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे.