नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज सणासुदीच्या काळात नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगावी असं आवाहन केलं. ते जनता संवाद कार्यक्रमात बोलत होते. देशभरात पुढील आठवड्यापासून नवरात्री, दसरा, धनतेरस, दिवाळी, काली पूजा, लक्ष्मीपूजन अशा अनेक सणांची रेलचेल असणार आहे. या काळात कोरोनाच्या प्रसारास वाव मिळू नये यासाठी लोकांनी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे व असे अन्य खबरदारीचे उपाय अवलंबावे असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं.
यावेळी आरोग्यमंत्र्याना, ‘मंत्रालयाच्या निर्देशांचं लोक गांभीर्याने पालन करतील का?’ असा प्रश्न विचारला असता त्यांनी, “सणासुदीच्या काळात कोरोना प्रसाराचा धोका अधिक असल्याने आम्ही चिंतीत आहोत. यामुळेच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन आंदोलनाची सुरुवात केली आहे. जर आपण सर्वांनी यात सहभाग नोंदवला तर आपोआपच कोरोना संबंधातील निर्देशांचे पालन होईल.” अशी प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधानांनी कोरोनाविरोधात छेडलेल्या जन आंदोलनाद्वारे त्यांनी आपण स्वतः कोरोना संबंधातील खबरदारी बाळगून इतरांनाही याचे अनुकरण करण्यास प्रोत्साहित करण्याचा संदेश दिला आहे.
“जर आपण लोकांना या बाबी समजवण्यात यशस्वी झालो तर सणासुदीचे हे दिवसही आनंदाने जातील. मात्र कोरोना संबंधातील खबरदारी पाळण्यात आपण जराही कुचराई केल्यास कोरोना पुन्हा फोफावेल.” अशी भीती व्यक्त केली.