मुंबई – राज्यातील माता भगिनींसाठी सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा “दिशा’ कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित “दिशा’ कायदा अंमलबजावणी तसेच महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, खासदार सुप्रिया सुळे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अनिल देशमुख म्हणाले, दिशा कायदा संदर्भात माता भगिनींसाठी मोठे सुरक्षा कवच निर्माण करण्यात येत असून यासंदर्भातील मसूदा अंतिम झाला आहे.
याबाबत माता-भगिनी तसेच तज्ज्ञांकडून अधिक सूचना देऊन त्याचाही अंतर्भाव यात करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करून हा कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेतला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत सर्व प्रकारच्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत त्याची नोंद घेवून हा कायदा अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार शासन करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.