प्रत्येक प्रभागात कर्मचाऱ्यांची टीम तैनात : प्रत्येक प्रभागात 25 कर्मचाऱ्यांची टीम
पुणे – यंदाच्या परतीच्या पावसाकरिता पुणे महापालिका पूर्णपणे सज्ज झाली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आली. प्रत्येक प्रभागात 25 कर्मचाऱ्यांची टीम तैनात ठेवण्यात आली असून अतिवृष्टी झाली तरीही जीवित व वित्तहानी होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. यंत्रणा पूर्णपणे हाय अलर्टवर ठेवण्यात आली असून कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देत सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
सर्व प्रभागात 24 तास आपत्ती व्यवस्थापनाची टीम डोळ्यात तेल घालून नागरिकांच्या सुरक्षेकरिता उपलब्ध असेल. गतवर्षी 25 सप्टेंबरला दक्षिण पुण्यात झालेल्या ढगफुटीनंतर अतिवृष्टी झाली व शहरच पाण्यात गेले होते. अनेकांचे संसार उघड्यावर पडले, गाड्या डोळ्यांदेखत वाहून गेल्या. तर अनेक जण मृत्युमुखीही पडले.
दरम्यान, पुणे शहर व परिसरात पुढील 4-5 दिवस परतीचा पाऊस पडणार असून 9 ते 12 ऑक्टोबरदरम्यान दुपारनंतर वादळी स्वरुपाचा पाऊस पडेल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.
नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, तसेच मुसळधार पाऊस पडल्यास घराबाहेर न पडता सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले.