तरुणाईच्या उत्साहावर विरजण : ऑनलाइन दांडियाचा पर्याय
पिंपरी – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सव देखील साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात यंदा गरबा आणि दांडियाचे कार्यक्रम घेता येणार नसल्याने तरुणाईच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मात्र, त्यांनी त्यावर ऑनलाइन दांडियाचा पर्याय शोधला आहे. परंतु दांडिया आणि गरबा हे सामूहिकपणे केले जाणारे प्रकार असल्याने एक किंवा दोन जणांनी घरातच गरबा-दांडिया खेळायचा व त्याची चित्रफीत ऑनलाइन दाखविण्याचा पर्याय तरुणाईच्या आनंद आणि उत्साहावर विरजण घालणारा आहे.
करोनाचा राज्यभरातील प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. उत्सवानिमित्त गर्दी होऊन करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, या उद्देशाने राज्य सरकारने नवरात्रोत्सवासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडीयाचे कार्यक्रम घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये होणाऱ्या गरबा आणि दांडीयाच्या कार्यक्रमाची महिनाभर आधीपासून विविध मंडळांकडून तयारी सुरू असते. गरबा नृत्याचे क्लासेस सुरू असतात. परंतु यंदा तेही बंद आहेत.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तरुणाईने देखील यंदा ऑनलाइन दांडियाचा पर्याय शोधला आहे. विविध गटांनी आपापल्या घरातच दांडिया खेळून व्हिडिओ क्लीपद्वारे तो ऑनलाइन दाखवायचा. त्याचे झुम ऍपद्वारे ऑनलाइन परीक्षण करायचे, असे नियोजन सध्या सुरू आहे. ऑनलाइनमध्ये गर्दीचा उत्साह आणि टाळ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. तथापि, सणाचा आनंद नागरिक घरबसल्या का होईना घेऊ शकतील, असे मत दरवर्षी दांडियामध्ये उत्साहाने सहभागी होणाऱ्या मयूरेश महाजन या तरुणाने व्यक्त केले.
नवरात्रातही देवीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढता येणार नाही. देवीच्या दर्शनाची ऑनलाइन सुविधा फेसबुक, यूट्यूब किंवा संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात दरवर्षी साजऱ्या करणाऱ्या मंडळांनी आणि संस्थांनी यंदा हा सण साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार मिरवणुका न काढणे, गरबा आणि दांडीयाचे कार्यक्रम न घेणे, गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर आदी सूचनांचे पालन केले जाणार आहे.
नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर पुढील वर्षी हा सण चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल. यंदा साधेपणाने हा सण साजरा करायला हवा. नवरात्रोत्सवानिमित्त आम्ही घेत असलेले कार्यक्रम यंदा रद्द केले आहेत.
– अमर कापसे, अध्यक्ष, जाणीव फाऊंडेशन