पिंपरी – हिंदू संस्कृतीमध्ये काही महिन्यांना पर्वकाळ व पवित्र मानले जाते. त्यात श्रावण व अधिक महिना सर्वश्रेष्ठ मानला जातो. मात्र यंदा करोनामुळे अधिक मासावर विरजण पडले आहे.
अधिक मासास मल मास, पुरुषोतत्तम मास, धोंड्याचा महिना म्हणून ओळखले जाते. अधिक महिन्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. या महिन्यामध्ये जावाईबापूंना विशेष मान दिला जातो. या मासामध्ये जेवढे पुण्यकर्म कराल तेवढे जास्त फल प्राप्त होते. त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरुपाच्या पूजाविधी, दान, पुण्यकर्म आदी करण्याची पद्धत आहे. पूर्वापार चालत आलेली रीत म्हणजे जावाई घरी बोलावून त्यांना वेगवेगळ्या वस्तूंचे दान दिले जाते. नवविवाहितांना सासरकडून वस्त्रदान, भेटवस्तू, सोने, तांबे आदी धातूंपासून बनविलेल्या वस्तूंचे वाण दिले जाते. वेगवेगळ्या गोड वस्तूंचेही दान देण्याची परंपरा आहे.
दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासावर यंदा करोनाचे सावट आहे. त्यामुळे यंदा जावई पाहुणचाराला मुकणार आहेत. करोनाचा वाढता प्रभाव, लॉकडाउनची स्थिती, सध्याचे अर्थिक संकट याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. यामुळे अधिक मासावर विरजण पडले आहे. त्यामुळे यंदाचा धोंड्याचा महिना जावाईबापूंना सुनानसुना जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. पितरांच्या नावाने गंगेमध्ये दीपदान केले जाते. हे दान केल्याने घऱातील पितृदोष नाहिसा होत असल्याचा उल्लेख पुराणात आहे.
मागणी घटली…
महिलांना या महिन्यात वाण देण्याची प्रथा आहे, त्यामध्ये ऐपतीप्रमाणे सोने, चांदीच्या वस्तू दिल्या जातात. विशेषकरून चांदीच्या वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. या वस्तूंना बाजारपेठेत.चांगली मागणी असते. मात्र यंदा मागणीही घटली आहे.