नोंदणी व मुद्रांक विभागाचे अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या विविध मागण्या शासनाकडे मांडल्या. मात्र प्रत्येकवेळी शासनाकडून पदरी निराशाच मिळत असल्याने नोंदणी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या गुरुवारपासून (दि.1) बेमुदत लेखणीबंद पुकारण्यात आला आहे. यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे काम तसेच इतर कामे बंद राहणार आहेत.
नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी मागील दोन ते तीन वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांबाबत शासनाकडे निवेदन देत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सर्व संवर्गातील रखडलेल्या पददोन्नत्या तात्काळ करणे, करोना महामारी मध्ये मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी हे शासनाचे 30 टक्के उपस्थितीचे आदेश असताना 100 टक्के उपस्थितीमध्ये काम करत आहेत. तथापी विभागातील कर्मचाऱ्यांनी मागणी करून सुध्दा जीव सुरक्षा विमा कवच लागू केलेले नाही. तुकडेबंदी कायद्याने होणारी कारवाई, रेरा कायद्यानुसार होणारी कार्यवाही या सर्व मागण्यांबाबत शासनाकडून अद्याप कोणतीच दखल घेण्यात आली नाही. याचसह आयकर विभागाचे विवरणपत्र, पोलिस विभाग व इतर विभागांकडून मागितली जाणारी माहिती, आय सरिता , ई फेरफार, ग्रास व आधार सर्व्हर आदी मागण्यांबाबत शासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये कोणत्याही सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. या सर्व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने दि. 1 ऑक्टोंबरपासून बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गजानन खोत आणि सचिव सागर पवार यांनी दिली आहे.