व्यापारी संघटनेची सरकारकडे मागणी
नवी दिल्ली – देश-विदेशातील बलाढ्य ई-कॉमर्स कंपन्या अनेक गैरव्यवहार करीत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांच्या संघटनेने केला असून त्याला आळा घालण्यासाठी नवे ई-कॉमर्स धोरण शक्य तितक्या लवकर जाहीर करण्याची मागणी केली आहे.
पुढील महिन्यात भारतामध्ये उत्सवाचा काळ सुरू होतो. या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे शक्यतो उत्सवाअगोदर हे धोरण जाहीर केले तर त्याचा उपयोग होईल, असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेने म्हटले आहे. मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांकडे प्रचंड भांडवल असते. त्या आधारावर त्या सूट जाहीर करतात आणि ग्राहक आपल्याकडे वळवितात.
त्याचा छोट्या दुकानदारांवर परिणाम होतो. त्यामुळे स्पष्ट ई-कॉमर्स धोरण जाहीर केल्यानंतर अशा प्रकारच्या गैरव्यवहाराला आळा बसू शकेल, असे या संघटनेने म्हटले आहे. सरकार धोरण तयार करण्याचा प्रयत्न करत असून गेल्या वर्षी अशा धोरणाचा मसुदा जाहीर चर्चेसाठी जारी करण्यात आला आहे.
या संघटनेने म्हटले आहे की, ई-कॉमर्स व्यवहारावर देखरेख ठेवण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी एखादी यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे. या यंत्रणेकडे पुरेसे अधिकार असले पाहिजेत, असेही या संघटनेने म्हटले आहे.