दुकानाऐवजी मॉलमधून किराणा आणि इतर वस्तू खरेदीचा वाढलेला ट्रेंड, सवलत, अगदी एक वस्तूपासून लागेल तितक्या वस्तू थेट घरपोच करणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांनी पारंपारिक स्थानिक व्यापारापुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे पारंपारिक व्यापार कमी होत असल्याची खंत व्यापारी नेहमीच व्यक्त करतात. त्यामुळे मॉल, ई-कोमर्स, मल्टिनॅशनल कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी पारंपरिक व्यापाऱ्यांना व्यापारामध्ये काळानुसार बदल करण्याची आवश्यकता आहे.
पूर्वी घराशेजारी असलेल्या किराणा दुकानातून नागरिक वस्तू खरेदी करत असत. तर, काही जण मार्केट यार्डातील अथवा इतर ठिकाणी असलेल्या घाऊक दुकानातून बाजार भरत असत. अगदी दहा ते पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत ही पद्धत रुढ होती. मात्र, जागतिकीकरणाचा फटका या पारंपरिक व्यापाराला बसला आहे. मॉल संस्कृती रुजली आहे. तेथे एकाच छताखाली सर्व वस्तू मिळतात. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी जाण्यास सुरुवात केली. शिवाय, मोठ-मोठ्या ई-कॉमर्स आणि मल्टिनॅशनल कंपन्या या बाजारात उतरल्या आहेत. स्वदेशी-परदेशी असलेल्या या कंपन्यांनी निवडक, स्वच्छ माल थेट नागरिकांच्या घरात पोहोचविण्यात सुरुवात केली आहे. अगदी अर्धा ते एक किलोपर्यंतची वस्तूदेखील ते थेट घरी आणून देत आहेत. त्यातच ऑनलाइन काम करणाऱ्या कंपन्यांना अनेक करांमध्ये सवलत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क त्या कंपन्यांकडून आकारण्यात येत नाही. त्यामुळे किराणा दुकानात मिळणाऱ्या दरापेक्षा कमी दराने माल घरपोहोच मिळत असल्याने नागरिक त्याकडे वळत आहेत. या परिस्थितीत पारंपरिक व्यापार टिकविणे आव्हान बनले आहे.
व्यापाऱ्यांच्या अडचणी पुणे मार्केट यार्ड घाऊक बाजारातील व्यापाराचा विचार केला केल्यास, बाजार समितीच्या नियमनाखाली त्यांना काम करावे लागते. सेस, देखभाल आणि इतर खर्चाला त्यांना सामोरे जावे लागते. ऑनलाइन व्यापर करण्यास त्यांना अद्याप परवानगी नाही. वस्तूंची किरकोळ स्वरूपात विक्री करता येत नाही.
व्यापाऱ्यांच्या मागण्या
सुरुवातीला सेससह इतर कर हटविण्याबरोबरच, एक ते पाच किलोपासून माल विकण्यास परवानगी द्यावी. घरपोच सेवेसह तुलनेने कमी खर्चात सेवा देणे आवश्यक आहे. सरकारने पारंपारिक व्यापाराला चालना दिली पाहिजे. करांसह विविध बाबींमध्ये सवलत दिली पाहिजे.